‘‘व्यर्थ न हो बलिदान’’ या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अभियानाचा पुण्यात शुभारंभ.
पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सुरूवातीला १ ते १५ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ‘‘व्यर्थ न हो बलिदान’’ हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केसरी वाडा, नारायण पेठ येथे सकाळी ९.०० वा., करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्याच्या खरा इतिहास तरूण वर्गापर्यंत पोहचविणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
या कार्यकमामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार करण्यात येणार असून त्यामध्ये वसंतराव जोशी, श्रीमती. उषा दामोदर देसाई हे स्वातंत्र्य सैनिक व लोकमान्य टिळक यांचे वंशज डॉ. दिपक टिळक, काकासाहेब गाडगीळ यांचे वंशज आनंद गाडगीळ, केशवराव जेधे यांचे वशच संताजी जेधे, शंकरराव मोरे यांचे वशंज दिपक मोरे, शिवराम राजगुरू यांचे वशंज सत्यशिल राजगुरू, बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद, ना. सी. फडके यांचे वंशज विजय फडके, नारायण दाभाडे यांचे वंशज धनंजय दाभाडे, लिलाताई मर्चंट यांचे सुपूत्र सुहास मर्चंट यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून स्वातंत्र्याच्या प्रेरणादायक अशा सर्व ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी भेटी देणे व त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा इतिहास उजागर करणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणे, ८ ऑगस्ट रोजी रात्री क्रांतीज्योत यात्रा काढणे, ९ ऑगस्ट रोजी सकाळी झेंडावंदन करणे, शहरात स्वातंत्र्याशी निगडीत असणाऱ्या स्थळांवरून सायकल फेरीचे आयोजन करणे, स्वातंत्र्याच्या लढ्यासंदंर्भात शॉट फिल्म स्पर्धेचे आयोजन करणे, १४ ऑगस्ट रोजी रात्री मशाल मिरवणुक काढून स्वातंत्र्य दिवस रात्री साजरा करणे आदी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
