राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता ‘या’ समुद्र किनारी राज्य सरकार बांधणार संरक्षण भिंत
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांचा समावेश
केरळ राज्याच्या धरतीवर राज्य सरकार घेणार निर्णय
मुंबई : राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असला असून निम्मा महाराष्ट्र पाण्याखाली गेला आहे. कित्तेकांचे बळी गेले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून राज्य सरकार वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या व समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
समुद्रकिनारा लाभलेल्या जिल्ह्यांपैकी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. संपूर्ण किनारपट्टीला संरक्षण भिंत बांधणं शक्य नाही. त्यामुळे ज्या गावांना समुद्राचा धोका आहे. पावसाळ्यात अथवा भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये येऊ नये. यासाठी ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. शेतजमिनीत समुद्राचं पाणी आल्यानंतर शेतजमीनिवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. त्यासाठी जवळपास एक हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पाचही जिल्ह्यातील माहिती घेण्यात आली असून येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
