कोल्हापुरात पूरपरीस्थिती, अनेक गावांशी संपर्क तुटला, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद
कोल्हापुर : अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पूरस्थितीमुळे निर्माण झाली असून हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुन्हा एकदा 2019 सारखी परीस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान पूरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. आंबेवाडी गावाला पुराचा वेढा आहे. चिखलीतही पाणीच पाणी झालंय.
शुक्रवारपासून कोसळणारा पाऊस आणि धरणांतून सोडलेलं पाणी यामुळं पूरस्थिती गंभीर झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने 2019 च्या भयानक महापुराचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 56 फूट 1 इंचावर जाऊन पोहोचली. पंचगंगेची पातळी 2019 ला 55 फूट 7 इंच इतकी होती.


पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद
या पूरस्थितीमुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद झालाय. कृष्णा नदी पात्राबाहेर आली की पहिल्यांदा पाणी लागतं ते नृसिंहवाडीतील दत्त दिगंबरांच्या पायाला.. सध्या मंदिर पाण्याखाली गेलंय. नृसिंहवाडीत नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. इथलं संपूर्ण बसस्थानक पाण्याखाली गेलंय. व्यापा-यांचे अक्षरश: कंबरडे मोडलंय. अगदी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील पाण्यात आहे.
कोल्हापूर येथे करवीर तालुक्यातील आंबेवाडीत गंभीर पूर परिस्थितीत एनडीआरएफच्या पथकाकडून मदत व बचाव कार्य सुरु आहे. pic.twitter.com/FSg56iU6oG
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2021
