दृष्टीहिन व दिव्यांग १५० कुटुंबांना धान्याचे किट
पुणे : सामान्यांचे कोविड काळात रोजगार हिरावल्याने मोठया प्रमाणात हाल झाले. मात्र, त्याहीपेक्षा स्वयंरोजगारावर अवलंबून असलेल्या दृष्टीहिन व दिव्यांग बांधवांना दोन वेळचे अन्न मिळणेही मुश्किल झाले. अशा दृष्टीहिन व दिव्यांग १५० कुटुंबांना मदतीचा हात देण्याकरीता तरुणाईने पुढाकार घेत लोकसहभागातून गोळा केलेल्या धान्याची मदत दिली आहे.
माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे विश्रामबाग वाडयासमोरील झांजले विठ्ठल मंदिरात दृष्टीहिन व दिव्यांग कुटुंबांना धान्य किट देण्याचा उपक्रम पार पडला. यावेळी चारित्र्य प्रतिष्ठानचे सीए सुरेश मेहता, सामाजिक कार्यकर्ते सत्येंद्र राठी, लिज्जत पापडचे सुरेश कोते, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजेंद्र खराडे, बाळासाहेब अमराळे, सतिश मोहोळ, संयोजक सारंग सराफ, आदित्य काकडे, साहिर शेख, महेश काबरा, अक्षय दामले, योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
व्यासपीठातर्फे एकूण ११०० कुटुंबांना धान्याच्या किटची मदत देण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरुपी धान्य देण्याचा देखील प्रयत्न आहे. यापूर्वी दगडखाण कामगारांना ८५ धान्याचे किट गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी आणि पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांच्या हस्ते देण्यात आले.
सुरेश कोते म्हणाले, सगळ्यात मोठा धर्म हा मानवतेचा धर्म आहे. कोविडच्या काळात गरजूंना योग्य वेळी मदत मिळणे गरजेचे आहे. त्याकरीता माणुसकीचे दूत च्या माध्यमातून तरुणाई पुढे येत असल्याचे चित्र समाजासाठी प्रेरणादायी आहे.
सारंग सराफ म्हणाले, समाजातील दृष्टीहिन व दिव्यांग गरजू कुटुंबांच्या घरची चूल विझू नये, याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत असून दानशूरांनी मदतीकरीता पुढे यावे. आम्ही तरुणांनी एकत्र येऊन हे कार्य हाती घेतले असून सर्वांनी सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. सत्येंद्र राठी, सुरेश मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र खराडे यांनी प्रास्ताविक केले. जयेश कसबे यांनी आभार मानले.