करोनामुक्त गावात शाळा सुरु होणार, वाचा काय आहे नियमावली
मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात अनेक भागात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने आज याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी केला. शाळा सुरू करण्यासाठी शाळा तसेच पालकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून या नियमांचे पालनकरून शाळा सुरू करण्यात येतील.
शाळा सुरू करण्यासाठीचे निकष
- आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी करोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीने संबंधीत विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करुन ठराव करावा.
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी बंधनकारक.
- दोन बेंचमध्ये किमान सहा फूटाचे अंतर हवे.
- प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक.
- शाळेतील शिक्षकांच्या राहण्याची सोय गावातच करावी.
- शिक्षकांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करावा लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.
- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. प्राधान्याचे विषय ठरवून वेळापत्रक तयार करण्यात यावे.
- एका बेंचवर केवळ एकच विद्यार्थी बसू असावा.
- एका वर्गात एकावेळी केवळ 15-20 विद्यार्थी बसू असावेत.
- विद्यार्थ्याला शाळेत येण्यासाठी सक्ती करता येणार नाही.
दरम्यान, मार्च 2020 पासून राज्यातील शाळा बंद असून टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत सरकारकडून अनेकदा नियमावली जाहीर करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या.
