Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

१५ वर्षांच्या संसारानंतर आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेतला आहे. बॉलिवूडमधील आदर्श समजल्या जाणाऱ्या या जोडप्याच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक संयुक्त निवेदन जारी करत आपण विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.

या निवेदनात ते म्हणाले आहेत, ‘१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू. तसेच मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार’, असे म्हणत आमिर आणि करणने चाहत्यांकडेदेखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद मागितले आहेत.

दरम्यान, किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. याआधी २००२ साली आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयला आणि जुनेद ही दोन मुलं आहेत. तर ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता. आता १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघे विभक्त झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading