नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादावर राज ठाकरेंनी सुचवला उपाय; म्हणाले ‘बघू आता कोण उतरतय रस्त्यावर ! ‘
मुंबई : नवी मुंबई येथे होत असलेल्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत असताना राज्य सरकारकडून मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह धरला आहे. विमानतळाच्या नामकरणावरून वाद पेटला असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर उपाय सुचवला आहे. नवी मुंबई विमानतळ हे शहरातच आहे. मुंबईच्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे, तेच नाव नवी मुंबईच्या विमानतळाला असणार आहे, आता हा विषय संपला आहे, असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकला आहे. तसेच माझ्या बोलण्यानंतर ‘बघू आता कोण उतरतय रस्त्यावर’, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र बोलणे झाल्यावर आपण राज ठाकरे यांच्याशी सहमत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले , मी त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडली. नवीन विमानतळे ही शहराच्या बाहेर होत असतात. जरी ते विमानतळ नवी मुंबईत होत असले तरी ते मुंबईचेच विमानतळ असणार आहे. आता जसे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव आहे तेच नाव तिकडे असणार आहे. मुंबईतील विमानतळ हे डोमेस्टीक असेल आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे नाव देणे योग्य ठरेल. ते विमानतळ या विमानतळाचा भाग आहे. त्याचा कोड BOM हेच असणार आहे, असेही राज ठाकरे यांनी समजून सांगितलं.
