मोदींना गुजरात तर ठाकरेंना मुंबई पलिकडे दिसत नाही – मनसेची टीका
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील नुकसान ग्रस्त भागाची हवाई पाहणी करुन मदत निधी जाहीर केला आहे. महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अद्यापही पाहणी दौरा केला नाही. यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. पंतप्रधानांना गुजरात आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महानगरपालिकेपुढे काही दिसत नाही असा टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळामुळे जिवितहाणी आणि वित्तहानी झाली आहे तर कोकणामध्ये घरांचे फार मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते बुधवारी रायगडमधील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यास गेले होते. रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, मुंबई, पालघर जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. वादळामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला यामध्ये वीजेचे खांब, शहरातील झाडे, आणि कोकणातील वाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अद्याप कोणतेही मदतीची घोषणा केली नाही आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा न करता फक्त गुजरात आणि केंद्र शासित प्रदेशाचा दौरा करुन मदत जाहीर केली आहे. यावरुन मनसेने टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी मनसेचे संदीप देशपांडे यांनी बुधवारी केली होती. यानंतर त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही. अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
देशपांडे यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमीधील तिवारीच्या पात्राप्रमाणे वावरत असतात. त्यांना स्वतःला अहं ब्रह्मास्मिचा भास होतो आणि त्याच थाटात ते वावरत असतात असा टोलाही राऊतांना संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
