राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ राबवणार, महाराष्ट्राला ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण बनवणार- उद्धव ठाकरे
मुंबई – देशात तिसरी लाट येणार असल्याचा इशारा केंद्र सरकारच्या विज्ञान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सामना करण्याकरता सरकार तयारी करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई मिशनची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असल्याचा उल्लेखही केला. त्याचप्रमाणे लवकरच महाराष्ट्र ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण होणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी राज्यात मिशन ऑक्सिजन योजना राबवणार असल्याचे सांगितले.
कोरोना रूग्णसंख्या काही जिल्ह्यांमध्ये घटत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये वाढते आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. रूग्ण वाढ थोपवण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 18 ते 44 या वयोगटासाठी 12 कोटी डोस लागणार आहेत. त्यासाठी एकरकमी चेकने पैसे देण्याची तयारी आहे याचा पुनरूच्चार उद्धव ठाकरेंनी केला आहे.
लसींचं उत्पादन हळूहळू वाढतं आहे त्याप्रमाणे लसाींचा पुरवठा होतो आहे. केंद्राला मर्यादा आहेत हे मी जाणतो आहे. त्यामुळे सध्या राज्यातली लसीकरण मोहीम ही काहीशी मंदावली आहे. आज घडीला ऑक्सिजनचा वापर हा 1700 मेट्रिक टन रोज लागतो आहे. 1200 मेट्रिक टन राज्यात निर्मिती होते आहे. तर 500 मेट्रिक टन केंद्राकडून मिळतो आहे. महाराष्ट्र हा 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करतो आहे ती निर्मिती आपल्याला 3 हजार मेट्रिक टनापर्यंत न्यायची आहे असं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रकल्पही उभे राहणार आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मिशन ऑक्सिजन हे या मोहिमेला नाव दिलं आहे. मिशन ऑक्सिजन हे महाराष्ट्रात होणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही काही प्रमाणात भासतो आहे. तो पुरवठाही लवकरात लवकर भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. औषधं, लसी, रेमडेसिवीर या सगळ्या गोष्टी कमी कशा पडणार नाहीत हे आम्ही पाहतो आहोत. सर्वात महत्त्वाचा आहे तो ऑक्सिजन. त्याबाबतीत महाराष्ट्राने स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे आणि आपण ते होणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
