पंढरपूर पोटनिवडणूक – भाजपचे समाधान आवताडे यांचा 3716 मतांनी विजय
पंढरपूर – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपुरकरांनी भाजपाला निवडून दिलं आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भागीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो’ असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.
आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. नंतर याचे रुपांतर विजयात झाले आहे.
भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू होती. कधी राष्ट्रवादी पुढे तर कधी भाजप आघाडी घेत होती. एकूण 38 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. 7 व्या फेरीपासूनच समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना विजयी घोषित करण्यात आले. राष्ट्रवादीने पंढरपूरमध्ये झालेला पराभव स्विकारला आहे. हा धनशक्तीचा विजय असल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी यांनी केली.
