Thursday, September 3, 2026
MAHARASHTRATOP NEWS

कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही; सावधगिरी बाळगा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 16 : कोरोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले. मात्र कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. यास्तव सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे विविध क्षेत्रातील ३५ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र, केरळ यांसह काही राज्यात कोरोनाचे रुग्ण पुनश्च वाढत आहेत. कोरोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून परंतू निर्भयतेने काम करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची तसेच बळींची संख्या कमी होती. देशातील समाज सेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छताकर्मी यांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केले व त्यांना देशातील दानशूर व्यक्तींनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच भारत कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुनिता सुमन सिंह व प्रताप सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्र कुमार सिंह व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते सायन इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. मोहन अच्युत जोशी, केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शुश्रुषा हॉस्पिटलचे डॉ. हर्षद शाह, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. विभा अग्रवाल, समाज सेवक इक्बाल इस्माईल ममदानी, रुग्णवाहिका चालक अनिल आदिवासी, उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे यांसह इतर कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

**

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading