fbpx
Saturday, April 20, 2024
MAHARASHTRA

उजेडाचे मानकरी सन्मान सोहळयाने नगर जिल्हयाच्या वैभवात भर – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

अ.नगर – नगर जिल्हा जशी संतांची भुमी आहे, तशी ती कर्तृत्ववान माणसांची कार्यभुमी आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करा अशी चळवळ डॉ. सुधाताई कांकरिया यांनी ३५ वर्षापुर्वी सुरू केली. या कार्यात देशभरात लाखो लोकांचा सहभाग व यश पहाता डॉ. सुधाताई यांना पद्मश्री किताबाने सन्मानीत करावे असा प्रस्ताव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपण केंद्र शासनाकडे पाठवू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. उजेडाचे मानकरी सन्मान सोहळयाने नगर जिल्हयाच्या वैभवात भर पडली आहे असे ही ते म्हणाले.

स्त्रीजन्माचे स्वागत व बेटी बचाओ या चळवळीच्या प्रणेत्या जेष्ठ समाजसेवीका कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकिरया यांच्या षष्ठयब्दीपूर्ती व चळवळीला ३५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल माऊली सभागृहात आयोजीत उजेडाचे मानकरी सन्मान सोहळयात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री राहीबाई पोपेरे, माजी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, डॉ. प्रकाश कांकरिया आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
या चळवळीत सहभागी झालेल्या राज्यातील ६० व्यक्तींचा प्रातिनिधीक स्वरूपात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विविध व्यक्ती व संस्थेतर्फे डॉ. सुधाताई यांचा गौरव करण्यात आला. अत्यंत नेटके आयोजन व सादरीकरणाने कार्यक्रम खुपच रंगतदार ठरला.
यावेळी बोलतांना डॉ. भोसले म्हणाले, बेटी बचाओ चळवळीचे बीजारोपण नगरमध्ये होऊन त्या कार्याची व्याप्ती जगभर झाली, याचा प्रत्येक नगरकरांना सार्थ अभिमान वाटायला हवा. इश्वराची इच्छा समजून जन्माला येणार्या प्रत्येक आपत्याचे स्वागतच व्हायला हवे. स्त्री पुरूष भेद आपण करू शकत नाही. डॉ. सुधाताईंकडून ईश्वरीय कार्य होत आहे. स्त्रीजन्माचे स्वागत तथा बेटी बचाओ समितीचे आपण जिल्हयासाठी पदसिध्द अध्यक्ष आहोत. या नात्याने जिल्हयात आणखी एका कार्यकर्त्याला सुधाताईंच्या रूपाने पद्मश्री किताबासाठी आपण निश्चीत शिफारस करू. त्या तोलामोलाचे त्यांचे कार्य आहे. असे भोसले म्हणाले.
यावेळी बोलतांना पोपटराव पवार म्हणाले, डॉ. सुधाताईंचे कार्य अत्यंत सेवाभावी पद्धतीने सुरू आहे. सामाजीक कार्याची सलग ३५ वर्षे सेवापुर्ती होण्याचे नगर जिल्हयातील एकमेव उदाहरण आहे. सेवाभावी कार्याचा कांकरिया कुटुंबाचा त्याग जिल्हयासाठी भुषणावह आहे. एकसष्टी समारंभानंतर डॉ. सुधाताई यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा सुध्दा अशाच पध्दतीने साजरा करण्याची संधी चळवळीतील कार्यकर्त्यांना मिळणार आहे. वाढदिवसाच्या दिवशी स्वत:ला मिरवून घेण्यापेक्षा सार्वजनिक जिवनात सहप्रवासी ठरलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
या वेळी बोलतांना माजी मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की डॉ. सुधाताईंनी स्वत:च्या पंचवीशीत म्हणजे अत्यंत तरूणपणात या चळवळीला सुरूवात केली. एवढया तरूणपणात स्वत:मध्येच रमण्यापेक्षा समाजात असणारी कमतरता हेरून ती दूर करण्यासाठी जीवापाड काम केले ही एक महत्वपूर्ण बाब आहे, आणि सतत ३५ वर्षे काम करणे हा ही एक आदर्श आजच्या तरूणपिढीनी आपल्या जीवनात जोपासण्यासाची गरज आहे. सोलापूरला १५ वर्षापासून सातत्याने त्या सामुदायिक विवाह सोहळयात येतात. वधू वरांचे समुपदेशन करतात, त्याद्वारे आज लोकमंगल प्रतिष्ठानच्या माध्यमातून २५०० जोडप्यांनी आठवा फेरा घेतला याचा मी साक्षीदार आहे.
बीजमाता राहिबाई म्हणाल्या की सुधाताईंचे काम बीजा प्रमाणे आहे. मी पण बीयांचे काम करते. बी पेरले तरच धान्य उगवते. तंसच मुलीचा जन्म झाला तरच पुढील पिढी निर्माण होईल अन्यथा नाही हे मुलभुत कार्य आहे. सुधाताईंचे कार्य गेल्या ३५ वर्षापासून मी ऐकत आहे, पहात आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये आता मुलींच्या जन्माचे स्वागत होऊ लागले आहे याचा आनंद वाटतो. सदर प्रसंगी ‘नकोशीला करूया हवीशी’ या उपक्रमातील ३ नकोशीचे नामकरण झालेल्या कन्या कल्याणी, स्वरदा, गायत्री या स्वत: उपस्थित होत्या. मान्यवरांच्या समवेत यांच्याही हस्ते दीपप्रज्वलन झाले. याचा उपस्थितांनी टाळया वाजवुन आंनद व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरूवात मनस्वी कोरडे हिच्या गणेश वंदनाने झाली. सदर प्रसंगी सुरूवातीला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, स्वातंत्र्यसैनिका शांता कोटेचा, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आय सी एम आर चे माजी चेअरमन डॉ. रमण गंगाखेडकर, देवगडचे भास्करगिरी महाराज, युनिवर्सिटी ऑफ माऊंटेन्सचे कुलगुरू व शास्त्रज्ञ डॉ. पॅलिकॅरीस (ग्रीस), पद्मश्री डॉ. के एच संचेती, व श्री उमाकांत दांगट (कार्यकारी संचालक महाराष्ट्र गांव सामाजिक परिवर्तन) यांचे आशीर्वादपर शुभ संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी स्त्रीजन्माचे स्वागत करा ची सामुहिक शपथ घेण्यात आली व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अविनाश मंत्री, सूत्रसंचालन श्री राजेंद्र टाक, स्वागत डॉ. सुधा कांकरिया तर डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading