नीतिमत्ता आणि अर्थव्यवस्था ग्राम संमृद्धीचा कणा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे, दि. ५ – “ नीतिमत्ता, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि वातावरण या गोष्टींवर सरपंचांनी भर दिल्यास गांव संमृद्ध होईल. शिक्षण, आरोग्य, पाणी, क्रीडा, संस्कार, अध्यात्म आणि बाजारपेठसारख्या बहुअंगाने विचार करावा. शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा उपयोग करून गावाचा सर्वांगिण विकास करावा. आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी तपासावा.” असा सल्ला केंद्रीय रस्ते दळनवळण आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सरपंचांना दिला.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे आयोजित तीन दिवशीय ऑनलाईन दुसर्या ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या समरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी केंद्रीय कृषी व पंचायतराज विभागचे मंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय राज्यमंत्री प्रताप चंद्र सरंगी, माजी केंद्रीय कृषी राज्य मंत्री पद्मभूषण हुकुमदेव नारायण यादव, जम्मू काश्मिरचे उप राज्यपाल मनोज सिंन्हा, खासदार पी.पी.चौधरी, माजी केंद्रीय ग्राम विकास राज्य मंत्री प्रदीप कुमार जैन आदित्य, बायफचे विश्वस्त किशोर ए चकुर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते व सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक राहुल विश्वनाथ कराड, महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील आणि सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
नितिन गडकरी म्हणाले,“ गावातील व्यक्ती शहरात गेल्यावर तेथेही बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळेस गावातच योग्य कौशल्याच्या आधारे रोजगार निर्माण करावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर गावात 24 तास वीज, चांगले रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि योग्य कनेक्टिव्हीटी असल्यास ते गाव समृद्ध होईल. गावातील प्रत्येक व्यक्तिकडे सॉईल टेस्ट कार्ड असावे तसेच गावात कोणते पीक घ्यावे याचे नियोजन करून सरपंचांनी मार्केटिंग करावे.”
“ प्रत्येक नागरीकाचा विकास व्हावा या साठी सरपंचाने मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करूणेे, गावात आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण करणे. त्यातून महिलांचा मानसिक विकास होईल. एकंदरीतच देशाच्या जीडीपीत 60 टक्के वाटा हा ग्रामीण क्षेत्र, 22 टक्के मॅनिफॅक्चरिंग आणि 54 टक्के वाटा सर्वीस सेक्टरमधून येतो. ही बाब लक्षात ठेऊन गाव समृद्धीच्या दिशेने नेण्यात सरपंच हा केंद्र बिंदू असतो.”
“ राज्यात बांधण्यात आलेल्या 180 पुलांच्या ठिकाणी जल योजनेच्या माध्यमातून तलाव निर्मिती करण्याची योजना आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतिल तर मागणी नुसार उत्पादन करावे. त्यासाठी सरपंचाची भूमिका महत्वाची आहे. तसेच, प्रत्येक गाव आर्थिक स्वावलंबी करायचे असेल तर ग्रामिण उद्योगांना अधिक चालना द्यावी. ”
नरेंद्रसिंग तोमर म्हणाले,“ ग्राम विकासासाठी सरपंचाने चिंतन, मनन आणि चर्चा या गोष्टींवर भर द्यावा. आध्यात्मिक शक्ती व नैतिकता ही समाजाला मजबूत करते याचे भान ठेवून गाव विकासचा आराखडा तयार करावा. गाव सशक्तीकरणसाठी येथील अर्थव्यवस्था मजूबतीवर भर, कृषी क्षेत्राला गती आणि गावात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी तयारी असावी. संपूर्ण विकास, संतुलन आणि सार्वांच्या सहयोगावर ग्राम विकासाचे सूत्र आधारित आहे. गावांना गती मिळण्यासाठी 13 व्या वित्त आयोगात ग्रामपंचायतेसाठी 65 हजार कोटी, 14 व्यात 2 लाख कोटी आणि 15 व्यात 3 लाख कोटीपेक्षा अधिक रूपयांचे नियोजन केले आहे.”
प्रतापचंद्र सारंगी म्हणाले,“ सरपंच हा लोकशाहीचा सर्वात मजबूत आधार असतो. त्यामुळे केंद्राने ग्राम पंचायतला काही विशेष अधिकार दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावाचा आर्थिक विकास करण्यासाठी नव्या योजना चालविल्या आहेत. या देशात आत्मनिर्भरचा नारा देण्यात आला परंतू खर्या अर्थाने जेव्हा व्यक्ती, पंचायत व गाव हा आत्मनिर्भर बनेल तेव्हाच भारत आत्मनिर्भर होईल. त्यासाठी गावातील लोकांना प्रशिक्षित करणे व ग्रामिण रोजगाराला प्रोत्साहन दयावे. शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्याचा अभ्यास करून सरपंचांनी त्याचा लाभ घ्यावा.”
मनोज सिन्हा म्हणाले,“ आर्थिक, सामाजिक आणि राजनीतिक व्यवस्थेचे मुळ तंत्र ग्राम पंचायत आहे. त्यामुळे गावाचा विकास आणि व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम सरपंचांनी करावे. लोकांच्या घरी जाऊन सरपंचानी समस्या सोडवावी. तसेच ,जल अभियान योजनेला गावा गावात मोठ्या प्रमाणात चालविल्यास देशात क्रांती होईल. ग्रामपंचायत सुयोग्य असेल तर देश धनधान्यांनी समृद्ध होईल.”
पी.पी.चौधरी म्हणाले,“गांव जेव्हा आत्मनिर्भर बनेल तेव्हाच देश आत्मनिर्भर बनेल. गावात जेव्हा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल तेव्हाच ग्राम सशक्त होईल. भारताच्या संविधानात ग्राम पंचायतला अधिक प्राध्यान्य देण्यात आले आहे. त्यामुळे गांवाना प्रगत करण्याचा प्रयत्न करतांना केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा उपयोग करून घ्यावा.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ सरपंच हा भारतीय संस्कृतीचा मुख्य गाभा आहे. आत्मनिर्भार भारत, निर्मलग्राम व स्वच्छ भारत या योजना राबविण्याचे कार्य सरपंचांनी योग्य प्रकारे करावे. विकासात आर्थिक गणिताचे ताळमेळ व जवाबदारी ही सर्वात महत्वाची आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “ सरपंचाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही सरपंच संसद भरविली जात आहे. संसदेच्या मंचावर मान्यवरांचे मार्गदर्शन, शासनाच्या योजनांची माहिती आणि भविष्यात ग्राम विकास कार्य पद्धती सारख्या अनेक विकासात्मक गोष्टींना सरपंच आपल्या गावात मूर्त रूप देऊ शकतो.”
या प्रसंगी किशार चकोर, हुकुमदेव नारायण यादव आणि प्रदीप कुमार जैन आदित्य यांनी मार्गदर्शन करून ग्रामविकासाचे सूत्र सांगितले. रविंद्रनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. शैलश्री हरिदास यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. महेश साने यांनी आभार मानले.
