fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNE

कोरोना आटोक्यात आणण्याचे खरे श्रेय डॉक्टरांना : राजेश टोपे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे डॉक्टरांचा सन्मान : पत्रकारांना विमा कवच मिळण्यासाठी प्रयत्न करणार


पुणे : कोरोना झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 600 दिवसांपर्यंत गेले आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्याचे खरे श्रेय डॉक्टरी सेवा देणार्‍या कोरोनायोद्ध्यांचे आहे, असे गौरवोद्गार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. कोरोनाकाळात अचूक बातमी देणार्‍या पत्रकारांना विमा कवच मिळालेच पाहिजे यासाठी मीही आग्रही असून पत्रकारांसाठी सरकार दरबारी मी कायम वकिली करीत राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली.


कोरोना साथीने थैमान घातलेले असताना आपल्या जीवाची पर्वा न करता सलग आठ महिन्यांपासून अधिक काळ रुग्णसेवेत झोकून देणार्‍या महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक-पत्रकारांचा विशेष सन्मान आज (दि. 4 डिसेंबर 2020) आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, दै. पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, आमदार रोहित पवार, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, लोहिया परिवार ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहिया, अभय संचेती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणेचे अध्यक्ष नितीन बिबवे व्यासपीठावर होते. कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व या वेळी स्वीकारण्यात आले.


टोपे पुढे म्हणाले, मानवतेचे रक्षण करण्याचे काम डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांमध्येच देवाचे दर्शन झाले आहे. या देवदूतांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केला हा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. कोरोना काळात अनेक हात पुढे आले. सेवा देण्याचे हेे काम मानवतेच्या दृष्टीने झाले आहे. पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले ही बाब सुद्धा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनावरील लस कधी येईल हे आज सांगणे शक्य नाही. पण केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लसीकरणाचा क्रम ठरविला जाणार आहे. लस हे अमृत नाही. जो पर्यंत लस येत नाही तो पर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कोरोना काळात अनेकांनी लढा दिला. या कोरोना वॉरिअर्सना शोधून काढून त्यांचा सत्कार केला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पत्रकारांनीही सकारात्मक बातम्या देऊन डॉक्टर, कर्मचारी तसेच या काळात मोलाचे योगदान देणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे मनोधैर्य वाढविण्यास मदत केली. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या 25 पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याची घोषणा केली.


कोरोना काळातील डॉक्टर, पोलीस, पत्रकार यांच्या कार्याचा गौरव करून डॉ. योगेश जाधव म्हणाले, राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचे पालन केले तर आजार फैलण्यास नक्कीच आळा बसू शकेल. पत्रकरांना विमा कवच मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. एम. एस. भरतवाल, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, औरंगाबाद येथील डॉ. अल्ताफ शेख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. अशोक संचेती, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. केतन आपटे, डॉ. शरण नरुटे, मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, सोलापूर रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. आनंद कांबळे, मुंबईच्या डॉ. सारिका पाटील, डॉ. जीत संगोई, डॉ. हनी सावला, सांगलीचे डॉ. विनोद परमशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे डॉ. अनिकेत राठी, पुण्याचे डॉ. शिशिर जोशी, चिपळूणचे डॉ. विशाल पुजारी यांचा डॉक्टर विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, नायडू हॉस्पिटलच्या परिचारिका छाया जगताप, जयश्री किल्लेदार, केदार कासार, वैष्णवी राठी, जंगम कुटुंबिय, आरोग्य निरिक्षक सचिन पवार यांना रुग्णसेवा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
सुनील कदम (पुढारी, कोल्हापूर), रोशनी शिंपी (दिव्य मराठी, औरंगाबाद), श्रीकांत साबळे (पुण्यनगरी, पुणे), समीर देशपांडे (लोकमत, कोल्हापूर), आनंद सुरवाडे (लोकमत, जळगाव) यांना संपादक/पत्रकार विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. अंबाबाई तालीम मंडळातर्फे एक हजार गरीब मुलांना मास्क आणि सॅनिटायझेरचे वाटप करणारे सिद्धार्थ भोकरे यांना युवा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सोलापूर दै. सकाळचे मुख्य बातमीदार सोनवणे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मुली आकांशा आणि प्रतिक्षा यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. या विषयीची माहिती महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. संस्थेद्वारे कोरोनाकाळात केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले कार्य अतुलनिय आहे. कोरोना संकटाविषयी काळजी कशी घ्यावी याची कुणालाही माहिती नव्हती. अशा परिस्थितीत प्रत्येक आघाडीवर डॉक्टर लढले, सेवा केली. या काळात पत्रकारांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

प्रास्ताविकात संजय भोकरे म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून डॉक्टररूपी देवाचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस, प्रशासन, डॉक्टर आणि पत्रकारांनी कोरोना काळात खूम मोठे काम केले आहे. पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी, पत्रकारांच्या आरोग्य विम्यासंदर्भात निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उपस्थितांचे स्वागत डॉ. योगेश जाधव, संजय भोकरे, किरण जोशी, नितीन बिबवे, अजित घस्ते, अभिजित डुंगरवाल, सुजाता खानोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बिबवे यांनी केले. पंकज बिबवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading