शहीद व बेपत्ता सैनिकांच्या वीरपत्नींसोबत सैनिक मित्रांची भाऊबीज
पुणे : सैनिक हो तुमच्यासाठी… जब देशमे थी दीवाली… ही गाणी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाला आपण ऐकतो आणि देशभक्तीने भारावून जातो. मात्र, अशी गाणी ख-या अर्थाने जगणा-या शहीद व बेपत्ता सैनिकांच्या वीरपत्नींसोबत पुण्यातील सैनिक मित्रांनी भाऊबीज साजरी केली. प्रपंचाची दुसरी लढाई समर्थपणे सांभाळणा-या सैनिकांच्या वीरपत्नींच्या डोळ्याच्या कडा देखील या देशभक्तीने भारलेल्या वातावरणात ओलावल्या.
निमित्त होते, सैनिक मित्र परिवारतर्फे वानवडी येथील वीरस्मृती या शहीद व बेपत्ता सैनिकांच्या पुनर्वसनासाठी बांधलेल्या जागेत आयोजित वीरपत्नींसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे. यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे समन्वयक भालचंद्र कुंटे, मुरलीधर घळसासी, शाहीर हेमंत मावळे, आनंद सराफ आदी उपस्थित होते. तर, गिरीश पोटपोडे, एडवीन रॉबर्ट, अजित पिंपळे, भारत खळदकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
राहुल सोलापूरकर म्हणाले, चिनी आक्रमणाच्या झळा ज्यांना केवळ देशाच्या सिमेवर नाही, तर घरापर्यंत जाणवल्या, अशा वीरपत्नींना माझा नमस्कार आहे. तिरंगी ध्वजावरील अशोकचक्र हेच आपले कुंकू असे मानणा-या हा वीरपत्नी आहेत. त्यामुळे प्रत्येक देशवासियांनी यांना सलाम करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. भालचंद्र कुंटे म्हणाले, भाऊबीजेचे दिवशी आम्हाला ख-या देवीचे दर्शन झाले. राज्यातील सर्व मंदिरे खुली झाल्याने देवी च्या दर्शना साठी मंदिरांमध्ये झुंबड उडाली असली, तरी वीरपत्नींच्या रुपातील देवीला नमन करणे, हा दुर्मिळ योग आहे.
आनंद सराफ म्हणाले, सैनिक मित्र परिवारतर्फे ,वीस वर्षाहून अधिक काळ केला जात आहे. विश्वलीला ट्रस्ट आणि रोटरी इनरव्हील क्लबचे या उपक्रमास सातत्याने सहकार्य मिळत आहे. यामाध्यमातून समाजातील विविध घटक या कार्यात सहभागी होत आहेत. युद्धामधे बेपत्ता आणि शहीद झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे वानवडी येथे चोवीस कुटूंबांसाठी वीरस्मृती ही वसाहत १९६८ साली उभी करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी पराक्रमी वीरांच्या विरहाची उजळणी आणि देशवासियांच्या कृतज्ञतेचा प्रत्यय यावा, हा उद्देश असतो.
