Thursday, September 3, 2026
PUNE

गणिताची गोडी वाढविण्याचा प्रयत्न स्तुत्य – सुभाष देसाई 

पुणे, दि. 3 – शैक्षणिक क्षेत्रात जरी डिजिटल युग आले असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये,असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री ,मराठी भाषा मंत्री  सुभाष देसाई यांनी मंगळवारी केले. 

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाची  राज्य मराठी  विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 
या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष  देसाई यांच्या हस्ते,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली  झूम मिटिंग द्वारे ऑन लाईन  कार्यक्रमात झाले . हा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १२ वाजता झाला .  मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने तसेच संस्थेच्या उद्दिष्टांशी पूरक असल्याने  महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य मराठी  विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला आहे.       

मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि   चे मुख्य कार्यकारी अधिकारी  मंदार नामजोशी यांनी प्रास्ताविक केले. अनिल गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, प्रशासकीय अधिकारी गिरीश पतके, मराठी काका म्हणून ओळखले जाणारे अनिल गोरे,पराग गाडगीळ,तालयोगी सुरेश तळवलकर,निर्मिती नामजोशी ,समीर बापट आदी या उदघाटन कार्यक्रमात सहभागी झाले. 

सुभाष देसाई म्हणाले,’गणिताची गोडी वाढविण्याचा अंकनादचा प्रयत्न स्तुत्य आहे. आपल्या जीवनात अंक आणि नाद अपरिहार्य आहे .पूर्वी प्रार्थना,परवचे ,पाढे होत असत .मुलांना ही सवय होती .तेव्हाच्या जीवनात सूर ,ताल साथ करीत असत . काकडारती ,घंटानाद ,जनावरांच्या गळ्यातील घंटाचा नाद हे भाव विश्व होते .कवितेचे ,गणिताचे नाद आणि तालाचा पाठिंबा असायचा .आता किती शाळात पाढे म्हणून घेतले जातात ? शैक्षणिक विश्व डिजिटल  झाले आहे .आधुनिक तंत्राचे स्वागत करताना पारंपारिक पाढे विसरता कामा नयेत .जुन्या पिढीला  निमकी ,अडीचकी ,पावकी ची परीक्षा असायची .पाठांतराची परंपरा अभ्यासातून कमी झाली तरी पाठांतराला दुय्यम लेखता कामा नये .हिशेब करताना या पाठांतराचा फायदा व्हायचा .जुनेपणाचा शिक्का मारून पाढे दूर लोटू नका .गणिताचे आकलन ,गोडी वाढविण्याचा मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा लि. चा  प्रयत्न स्तुत्त्य आहे’.
  कुलगुरू डॉ नितीन करमळकर म्हणाले,’ लयबद्ध माध्यमातून गणित पुढे जाण्याचा प्रयत्न होतो आहे ,ही अत्यंत चांगली गोष्ट आहे .गणित आपल्याला अवघड वाटते .पण,गणित योग्य पद्धतीने शिकवले गेले तर त्याचा आयुष्भर उपयोग होतो .आजच्या जगात अल्गोरिदम लिहायला गणिताचा उपयोग होतो .अनेक विद्यार्थी भीती पोटी गणितापासून दूर जातात.गणित हा घाबरण्याचा विषय नाही’ असे मी सांगू इच्छितो .  
मराठी काका म्हणून परिचित असलेले अनिल गोरे म्हणाले,’७० टक्के संभाषणाच्या वाक्यात संख्या,अंक येतात .विद्यार्थी ते विक्रेते या वर्गाला अंकनाद ,पाढे पाठ आहेत ,त्यांना सेकंदात आकडेमोड करता येते. कागदावर हिशेब आणि गणकयंत्र वापरायची गरज नाही.मानवी वेळ वाचवायचा असेल तर अंक,पाढे ,पावकी –निमकी –अडीचकी पाढे उपयोगी होईल.देशाची उत्पादकता वाढेल.मराठी सोडून अन्य भाषांमध्ये ही गोष्ट नाही .अंक नादचा नाद जगाला लागेल,यासाठी प्रयत्न करूया’.
मंदार नामजोशी यांनी पाढे स्पर्धेची माहिती दिली.  ३० नोव्हेंबर पर्यंत नोदणी करता येणार आहे .३१ डिसेंबर पर्यंत पाठांतराचे व्हिडीओ अपलोड करता येतील.१ ते १५ जानेवारी पर्यंत परीक्षण होईल.१५ जानेवारीला जिल्हास्तर निकाल जाहीर केला जाईल . ११ हजार ,७ हजार ,५ हजार अशी पारितोषिके असणार आहेत.बालगट (वयोगट – 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100 असा स्पर्धेचा विषय आहे . दुसरी, तिसरी साठी 1ते 10 पाढे, 11 ते 20 पाढे, 21 ते 30 पाढे असा स्पर्धेचा विषय आहे .चौथी, पाचवी साठी पावकी, निमकी असा स्पर्धेचा विषय आहे .सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी असा स्पर्धेचा विषय आहे .
आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे . खुला गट मध्ये पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading