Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRA

बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव, दि.१७ – बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पीडितांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यासाठी अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

बोरखेडा, ता.रावेर येथे चार बालकांची निघृण हत्या झाली त्या ठिकाणास गृहमंत्री श्री.देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री सर्वश्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, प्रांताधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, या हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहेत. काही संशियतांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पीडितांना योग्य ती मदत देण्यात येईल तसेच त्यांना रेशनकार्ड, जातीचा दाखला, घरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading