महाराष्ट्रात १ हजार वर्षांपासून गणेश भक्तीची परंपरा- पांडुरंग बलकवडे
पुणे : महाराष्ट्रातील गणेश संप्रदाय मोरया गोसावी यांनी स्थापित केला आणि त्याचा प्रसार केला. महाराष्ट्राचा आदिगणेश कसब्याचा गणपती आहे. बाजीराव पेशवे यांनी शनिवारवाड्याची स्थापना करताना गणेश दरवाजाशेजारी गणेशाची स्थापना केली. शनिवारवाड्यामध्ये भव्य दिव्य गणेशोत्सव साजरा होत असे. यामध्ये सर्व जाती-धमार्चे लोक सहभागी होत असत. यामधूनच गणेशोत्सव हा कोणत्याही एका धमार्चा नाही हे लक्षात येते. महाराष्ट्रात १ हजार वर्षांपासून गणेश भक्तीची परंपरा सुरु झाली. परंतु पेशवाई खालसा झाल्यानंतर गणेशोत्सव बंद झाला, असे मत ज्येष्ठ इतिहासज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
पुणे गणेश फेस्टिव्हल डॉट कॉमचे स्वप्नील नहार आणि सुप्रसाद पुराणिक लिखीत व संकलित “पुण्याचे सुखकर्ता” या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे व अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते अखिल मंडई मंडळाच्या समाजमंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अॅड. गणेश सातपुते, निवेदक सुधीर गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आणि विविध मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव हे पुण्याचे श्रद्धास्थान आणि पुण्याचा गौरव आहे. परंतु या गणेशोत्सवाच्या इतिहासाचे योग्य पद्धतीने लेखन झाले नाही. पुण्याचे सुखकर्ता हे पुस्तक म्हणजे १२५ वर्षाच्या गणेशोत्सवाचा दस्तावेज आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुबोध भावे म्हणाले, पुण्याचे सुखकर्ता या पुस्तकाच्या माध्यमातून पुण्याचा गणेशोत्सव जगभर पोहोचेल. गणेशोत्सव आणि पुण्याचे वेगळेच नाते आहे. पुण्याचा गणेशोत्सव हे अनुभविण्याचे साधन आहे. नविन पिढीला हा गणेशोत्सव माहित होण्यासाठी पुस्तक उपयुक्त ठरेल.
पुस्तकाबद्दल बोलताना स्वप्नील नहार म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने करावा लागत असल्याने पुणेकरांनी नाराज न होता १२५ वर्षांहून जुना उत्सव या माध्यमातून अनुभवायला मिळेल. मी मंडळांची आणि सुप्रसाद पुराणिक याने मंदिरांची पुस्तकामध्ये सुंदर मांडणी केली असून त्याला छायाचित्र आणि नकाशाची उत्तम जोड दिली आहे. पुण्यातील गणपतींविषयी जाणून घेण्याकरीता व पर्यटन करताना हे पुस्तक उत्तम असणार आहे. तरी वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले. आनंद सराफ यांनी देखील मनोगत व्यक्त केले.