Monday, June 22, 2026
MAHARASHTRA

…म्हणून गणेश मंडपाची परवानगी घ्या – आशिष शेलार

मुंबई, दि. ३० – तुम्हाला पुढच्यावर्षी गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर यंदा गणेश मंडपाची परवानगी घ्या. करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा नाही केला तरी चालेल. तो तुमच्या मंडळाचा निर्णय असेल. पण मंडपाची परवानगी घ्या, नाही तर पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात, असं आवाहन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. दरवर्षी गणेशोत्सव मंडळे मुंबई महापालिकेकडे मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करत असतात. दरवर्षी १२ हजाराच्यावर अर्ज येत असतात. पण यंदा करोनाचं संकट असल्याने केवळ ६०० ते ६५०च अर्ज आले आहेत. ही बाब चिंताजनक आहे. गणेशोत्सव साजरा करा अथवा नका करू, पण यंदाही मंडपासाठी परवानगी घ्या, असं सांगतानाच गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मंडपाच्या परवानग्यांकरीता मोठा न्यायालयीन संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी परंपरा आणि सातत्य या मुद्द्यावर मंडळांना परवानग्या देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ही परंपरा आणि सातत्य खंडित होऊ द्यायचं नसेल तर सर्व मंडळांनी मंडपाची परवानगी घ्यावी, नाही तर पुढच्या वर्षी अडचणी निर्माण होऊ शकतात. न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

गणेशोत्सवाबाबत ठाकरे सरकार बोटचेपं धोरण का घेत आहे? हे कळायला मार्ग नाही. गणेशोत्सवासाठी करावा लागलेला न्यायालयीन संघर्ष ठाकरे सरकार आणि सरकारमधील पक्षांना माहीत नाही. त्याचं त्यांना ज्ञानही नाही. त्यामुळे मंडपासाठी परवानगी घेणं गरजेचं आहे, अशी टीका करतानाच पालिका प्रशासनाने गतवर्षीच्या आकडेवारीचा आधार घेऊन सरसकट सर्व मंडळांना मंडपाची परवानगी द्यावी, तसं पत्रक काढावं किंवा जीआर काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading