मोदींवर टीका करणं सोडा अन् काँग्रेसवर लक्ष द्या; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
मुंबई, दि. 30 – काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका करण्याचं सोडून द्या आणि काँग्रेस वाढवण्यावर लक्ष द्या, असा सल्ला शरद पवार यांनी राहुल गांधींना दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांनी राहुल गांधींना हा सल्ला दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मी काँग्रेसला पाहत आलो आहे. गांधीवाद ही काँग्रेसची मोठी ताकद आहे. तसं माझं निरीक्षण आहे. काँग्रेसमधील विविध गटांना एकत्रित आणण्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यशस्वी ठरल्या आहेत. दरम्यान, आता काँग्रेसनेही राहुल गांधींचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे संपूर्ण काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली पाहिजे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. मात्र, त्यांचा हा पक्षांतर्गत विषय आहे, असं देखील पवार म्हणाले.
राहुल गांधी यांनी काँग्रेसची धुरा कशी सांभाळावी? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले केवळ पक्ष सांभाळून चालणार नाही. तर पक्षातील विविध नेत्यांशीही राहुल गांधी यांनी सातत्याने संवाद साधायला हवा. राहुल गांधींनी पक्षातील सर्व नेत्यांना एकत्र आणायला हवं, असं शरद पवार म्हणाले.
