Tuesday, September 1, 2026
MAHARASHTRA

संविधान विषयक अभ्यासक्रम अनिवार्य करा, महाराष्ट्रातील विचारवंतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, दि. 23 – महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात संविधानातील मुल्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. यात भाषतज्ज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी, ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे, शाहीर संभाजी भगत, राम पुनियानी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मागणीला महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. या पत्रात बारावीच्या परीक्षांसाठी किमान 50 गुणांचा संविधान अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनात म्हटलं आहे की, “आपल्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचं महाराष्ट्रातील जनतेनं खूप विश्वासानं आणि अपेक्षा ठेवून स्वागत केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकराजा शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा सामाजिक परिवर्तनाचा वारसा सांगत हे सरकार सत्तेवर आलं आहे. या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचे सार आपल्या भारतीय संविधानात उतरलेले आहे. ज्या संविधानाच्या आधारे आपल्याला आपला भारत घडवायचा आहे ते संविधान नागरिकांनी समजून घेणे फार आवश्यक आहे.”

“शालेय वयातील विद्यार्थ्यांना पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्वाच्या तरतुदी शिकवणे शक्य आहे. हे काम प्रभावीपणे होण्यासाठी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने संविधानिक मुल्यांबाबत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखावा. विविध विभागात शिक्षकांची संविधान साक्षरता शिबीरं आयोजित करावीत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सर्व माध्यमातील बारावीच्या परीक्षांसाठी त्या त्या भाषेमधून येत्या शैक्षणिक वर्षांपासून किमान 50 गुणांसाठी संविधान मूल्यजागृती अभ्यासक्रम अनिवार्य करावा,” अशी मागणी या विचारवंतांनी केली आहे.

“भारताचे संविधान शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले, तर आपल्या राज्याच्या आणि राष्ट्राच्या उभारणीत ते योग्य दिशेने आपापल्या क्षेत्रात कार्य करु शकतील. तरी येत्या मंत्रिमंडळ बैठकीच्या विषयपत्रिकेवर हा विषय अग्रक्रमाने घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी या विचारवंतांनी केली.
ही मागणी करणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गणेश देवी, शाहीर संभाजी भगत, डॉ. महेश केळुसकर, यशवंत मनोहर, हेरंब कुलकर्णी, राम पुनियानी, डॉ. विश्वंभर चौधरी, हरी नरके, प्रा. प्रज्ञा दया पवार, प्रा.वामन केंद्रे, सुषमा देशपांडे, प्रेमानंद गज्वी, जयराज साळगावकर, आनंद पटवर्धन, श्रीनिवास नार्वेकर, सुभाष वारे, संजय आवटे, अल्लाउद्दीन शेख, अरुण म्हात्रे, साहेबराव ठाणगे ,डॉ. प्रदीप आगलावे, मारुती शेरकर, जालिंदर सरोदे, डॉ. विजयकुमार गवई इत्यादींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी संघटनांनी राज्यव्यापी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक घेत संविधान मुल्यांवरील अभ्यासक्रमाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यात एनएसयूाय , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, छात्र भारती, युक्रांद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, स्वाभिमानी विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र स्टुडन्ट युनियन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, इस्लामिक स्टुडन्ट युनियन, युवा संघर्ष समिती, महाराष्ट्र स्टूडन्ट वेलफेअर असोसिएशन या विद्यार्थी संघटनांचा समावेश आहे.

या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसाराची मागणी केली. तसेच सी. बी. एस. सी अभ्यासक्रमातून संवैधानिक मूल्ये वगळण्याच्या निर्णयाचाही विरोध केला. यावेळी या विद्यार्थी संघटनांनी सीबीएससीला राज्यभरातून पत्रं पाठवून अभ्यासक्रमात संविधानाची मुल्यांचा समावेश करण्याचीही मागणी केली. लवकरच ऑनलाईन विद्यार्थी परिषद आणि ऑनलाईन संविधान शिबीर कार्यक्रमाची घोषणा करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading