राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन
मुंबई, दि. 16 – राज्यातील धडाडीच्या माजी आय ए एस अधिकारी नीला सत्यनारायण यांचे आज दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील प्रशासकीय व राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती खालावत गेल्यामुळे अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

१९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून ३७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
मराठी साहित्यात रमणाऱ्या सत्यनारायण यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या होत्या. अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केलं होतं. काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला. त्याचं संगीत दिग्दर्शन त्यांनीच केलं होतं.
