Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल महोदय आणि शासनास सादर करावा, अशा सूचना आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचे की कसे, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत असाच निर्णय घेण्यात येईल. त्याच बरोबर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावरही याचा काही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा पूर्णपणे विचार करून वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवत विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी संगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालये, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे  क्वारंटाइनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत शक्य होईल, यावर चर्चा झाली.

आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ.अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे  कुलगुरू सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading