ठाकरे गटात मोठी खळबळ; ८२ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पक्षातील तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
आनेराव यांच्या समर्थकांनी या निर्णयाला विरोध करत पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे परभणीतील ठाकरे गटामध्ये अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनीही राजीनामे दिल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार राहुल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना ही “नेते घडवणारी फॅक्टरी” असल्याचे सांगितले. कोणासाठीही वेळ थांबत नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खासदार संजय जाधव शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना, अशी कोणतीही माहिती आपल्या कानावर नसल्याचे राहुल पाटील यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी भाजपावरही टीका केली. भाजप किती लोकांना पक्षात घेणार, हेच आता समजत नसल्याचे सांगत त्यांनी “त्यांची गाडी फुल झाली आहे,” असा टोला लगावला. ज्या पक्षात खूप लोक होतात, तो पक्ष टिकणे कठीण जाते, असेही राहुल पाटील यांनी म्हटले.
