सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा विमान अपघाताची चौकशी
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मागणी
मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. इतर कोणत्याही संस्थांवर आपला विश्वास नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
आज सकाळी पावणे नऊ वाजता बारामती विमानतळावर अजित पवार यांचे विमान उतरत असताना त्याचा स्फोट होऊन विमानातील पवार यांच्यासह सर्व सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला. यावर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच या अपघाताची कसून चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.
महायुतीमध्ये सहभागी होऊन अजित पवार हे सत्तेत आले होते. मात्र, मागील काही काळात ते भाजपपासून दूर होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या अपघातामागे राजकीय कट असण्याची शक्यता बॅनर्जी यांनी सुचित केली. त्यामुळेच अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून विमान अपघाताची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशा घटना वारंवार का घडतात, असा सवाल उपस्थित करून या अपघाताच्या चौकशीची मागणी योग्यच असल्याचे मत यादव यांनी व्यक्त केले आहे.
