Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

उपासना, आचरण, समाज आणि राष्ट्र या चारही पातळीवर चा धर्म शिकवण्याची आवश्यकता  -भैय्याजी जोशी

पुणे : जसा समाज धर्म आहे तसा राष्ट्रधर्म देखील आहे. समाजधर्म एकतेचा संदेश देत असेल तर राष्ट्रधर्म हा कर्तव्याचा संदेश देतो. उपासना धर्म पालन करणारे राष्ट्रधर्मापर्यंत गेले नाहीत तर ते उपचारात्मक आहे. ‘राष्ट्र हित सर्वो परी’ असे म्हणून जो जीवन आचरणात आणि तो खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्म पालन करेल. आज धर्म शिकवायचा असेल तर उपासना, आचरण, समाज आणि राष्ट्र या चारही पातळीवर चा धर्म शिकवण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार चेन्नईचे महामहोपाध्याय आर. मणि द्राविड शास्त्री आणि तिरुपतीचे डॉ. कुटुंब शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात पुरस्कार सोहळा झाला. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. श्रींची प्रतिमा, सन्मानपत्र, मानवस्त्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे ४२ वे वर्ष आहे. वेदमूर्ती देवव्रत रेखे आणि महेश रेखे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

भैय्याजी जोशी म्हणाले, भारत हा धार्मिक देश आहे. भारतात जन्म घेणे हे भाग्याचे आहे. धर्माचे जाणकार असतील परंतु ते आचरणात आणून राहणारे कमी आहेत. आदर्श जीवन प्रस्तुत करणे आणि लोकांना धर्माधिष्ठित करणे हे आदर्श आहे. जे मंदिरात जातात, व्रत – उपवास करतात त्यांना लोक धार्मिक समजतात परंतु हा उपासना धर्म आहे आणि धर्माच्या वाटेवर जाणारी ही पहिली पायरी आहे परंतु तिथे थांबून चालत नाही त्याचे पुढचे पाऊल म्हणजे आचरण.  बाह्य शुद्धता ही साधनांनी होते. पण आंतरिक शुद्धता ही आतून करावी लागते.

महामहोपाध्याय आर. मणि द्राविड शास्त्री म्हणाले, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संस्थेकडून मला पुरस्कार मिळात आहे याचा मला अभिमान वाटतो. पेशव्यांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवणे हीच खरी त्यांच्या सन्मानाची गोष्ट आहे. मी देखील माझ्या गुरुजींकडून मिळालेली वेदशास्त्राची विद्या पुढे चालू ठेवण्याचे कार्य करीत आहे. आज नवयुवक वेदविद्या शिकण्यासाठी येत आहेत, ही देखील अभिमानाची बाब आहे. यात नवचेतना दिसत आहे. ज्या विद्येचा समाजासाठी उपयोग नाही, ती विद्या प्रकाशमान राहू शकत नाही. परंतु विद्या जिवंत ठेवण्यासाठी जनजागृती करणेही आवश्यक आहे.

डॉ. कुटुंब शास्त्री म्हणाले, माझ्यासाठी हा पुरस्कार प्रोत्साहन देणारा आहेच, पण तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. समाजासाठी नेहमी चांगले कार्य करण्याचा विचार मनात ठेवा, तर समाज देखील तुमचा सन्मान करेल. जे कार्य तुम्ही करत राहाल, ते तुम्हाला पुढे जाण्याचे बळ देत राहील. तुमच्यातील सत्वबळ ओळखण्याचा प्रयत्न करा. त्या सत्वगुणामुळे तुम्हाला तुमचे कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळते , असे ही त्यांनी सांगितले

रमेश भागवत म्हणाले, पूर्वापार चालत आलेल्या अनेक परंपरा जपण्याचे काम श्री देवदेवेश्वर संस्था करत आहे. वेदपठण करणाऱ्या गुरुजींना दक्षिणा करणे. धर्माची सेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे तीच परंपरा लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्याचा उद्देश आहे. नानासाहेब पेशवे हे स्मार्ट पुण्याचे जनक आहे. त्यांनी वाढत्या पुण्याचे स्वरूप पाहता पाण्याची उत्तम सोय केली जी आजही सुरू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading