वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त ४ ते १२ जानेवारी दरम्यान अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे, : पुण्यातील वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त येत्या दि. ४ जानेवारी ते १२ जानेवारी, २०२६ दरम्यान पौड रस्ता, कोथरूड येथील वेदभवनाच्या परिसरात अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत द्वारकाशारदापीठाचे अनंतश्रीविभूषित पश्चिमाम्नाय द्वारकापीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य प. प. सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या भागवत कथा ज्ञानसत्राचा विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्रीमद् भागवत सेवा समितीचे अध्यक्ष भागवताचार्य गोविंद देवगिरी स्वामी महाराज यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदेत दिली.
यावेळी या दरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे संयोजक आणि वेदभवनचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, समितीचे कार्यवाह व मुंबई उच्च न्यायालयातील वकील उदय प्रकाश वारुंजीकर आणि प्रसन्न पेडगांवकर आदी उपस्थित होते.
स्वामी महाराजांनी वेदभवनाचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारुन ही भागवत कथा करण्याचे मान्य केल्याने तब्बल १२ वर्षांनंतर त्यांची ही कथा पुण्यात होत आहे असे सांगत गोविंद देवगिरी स्वामी महाराज म्हणाले, “इतक्या वर्षांनंतर हा योग जुळून आला असल्याने स्वामी महाराजांची ही कथा ऐकणे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे व या संपूर्ण भागवत कथा ज्ञानसत्रामध्ये पुण्यातील नागरीकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे.”
ते पुढे म्हणाले की, वेदभवन वर्धापनदिनाचा कार्यक्रम हा रविवार दि. ४ जानेवारी, २०२६ रोजी स्वामीजींच्या शोभायात्रेने सुरु होईल. दुपारी ४ वाजता पौड रस्त्यावरील प्रसिद्ध शृंगेरी शारदापीठाच्या मंदिरापासून या शोभायात्रेचा प्रारंभ होईल. सुरुवातीला जगद्गुरु शंकराचार्य हे शृंगेरी मठातील देवतांना पुष्पहार समर्पण करुन पूजा करतील, त्याचबरोबर भागवत ग्रंथाचे पूजन करुन भागवत ग्रंथासह स्वामीजी रथामध्ये आसनस्थ होतील. श्रीमद् भागवत सेवा समितीचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जगद्गुरु शंकराचार्यांना पुष्पहार समर्पण करुन शोभायात्रेस प्रारंभ करतील.”
या शोभायात्रेत पुण्यातील सनातन धर्मप्रेमी मंडळींनी पारंपारिक वेषभूषा धारण करुन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामीजींनी पुणेकरांना केले आहे. वेदभवनात ज्या ठिकाणी ही भागवत कथा होणार आहे, त्या मंडपाला ‘श्रीकृष्ण नगरी’ असे नाव देण्यात आले असून याच ठिकाणी पुढील आठ दिवसाचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये दि. ५ जानेवारी ते ९ जानेवारी पर्यंत दुपारी ३:३० ते सायं. ५:१५ या वेळेत ह.भ.प. कैलासबुवा खरे यांची भागवत कथेवर कीर्तने होणार आहेत.”
दि. १० व ११ जानेवारी रोजी दिल्ली येथील लाल बहादुर शास्त्री संस्कृत विश्वविद्यालयातील व्याकरणाचार्य पंडित जयकान्त शर्मा यांची व्याख्याने होणार आहेत व दि. ५ जानेवारी ते ११ जानेवारी या काळात श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य यांच्या रसाळवाणीतून सायं. ५:३० ते रात्री ८ या वेळात हिंदी भाषेतून श्रीमद् भागवत कथा ऐकावयास मिळेल. दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता विष्णुयागाचे आयोजन करण्यात आले असून ह.भ.प. कैलासबुवा खरे यांचे काल्याचे कीर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे, अशी माहितीही गोविंददेवगिरी महाराज यांनी दिली.
द्वारकाशारदापीठाचे अनंतश्रीविभूषित पश्चिमाम्नाय द्वारकापीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य प. प. सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या विषयी –
भारतात सनातन धर्माची पुनर्स्थापना करणारे श्रीमद् जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी भारताच्या चार दिशांना सनातन धर्मांच्या प्रसारासाठी चार पीठांची स्थापना केली. यापैकी पश्चिमेचे पीठ म्हणून असलेले गुजरात प्रांतातील श्रीकृष्णांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्वारकाशारदापीठाचे अनंतश्रीविभूषित पश्चिमाम्नाय द्वारकापीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य प. प. सदानंद सरस्वती स्वामी महाराज हे प्रमुख आहेत. जगद्गुरु शंकराचार्य यांनी काशीमध्ये सर्व शास्त्रांचे अध्ययन केले आहे. त्यांच्या रसाळ वाणी व शास्त्रीय भाषेतून ते आपण सर्वांना भागवत कथा सांगणार आहेत. त्यांच्या वाणीतून श्रीकृष्ण नगरीत आपल्याला भागवत कथा ऐकावयास मिळणे हे खरेतर भाग्याचा अनुभव आहे. वेदभवनाच्या परिसरात ही कथा श्रवण करुन त्रिवेणीमध्ये स्नान केल्याचे पुण्य उपस्थितांना मिळेल.
