Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

इंडियन मीडिया बॅरोमीटर २०२५ अहवालाचे प्रकाशन

पुणे : ‘इंडियन मीडिया बॅरोमीटर२०२५’ हा प्रिंट, टेलिव्हिजन आणि सोशल मीडियाचा अद्वितीय आरोग्य-अहवाल, भारतातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेद्वारे पहिल्यांदाच सादर करण्यात आला असून, तो श्री बालाजी विद्यापीठ पुणे (एसबीयुपी) यांनी आयोजित केला. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी एकत्र येऊन भारतीय माध्यमांच्या आजच्या स्थितीचे डेटा-आधारित, तीक्ष्ण विश्लेषण करण्यात आले.

मुख्य अतिथी महेश झगडे, माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन यांनी या अहवालाचे वर्णन ‘भारतीय माध्यमांच्या आरोग्याची डायग्नोस्टिक तपासणी’ असे केले. लोकशाहीतील पत्रकारितेच्या भूमिकेचे क्षरण होत असल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. एकेकाळी भयमुक्त ‘वॉचडॉग’ असलेली माध्यमे आता उत्पादना प्रमाणे वागत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्य प्रवाहातील तसेच सोशल मीडिया दोन्ही “कृत्रिम किंवा निर्मित सामग्री’’कडे झुकत असल्याचे सांगत त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला – जे नागरिकांच्या समजुतीला भ्रमित करते आणि लोकशाही कमकुवत करते. “माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली भूमिका पुन्हा मिळवण्यासाठी त्यांचे पुनःअभिमुखीकरण करणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की हा चौथा स्तंभ सध्या ‘देवकिड्यांनी पोखरल्यासारखा’ जवळजवळ अस्तित्वहीन झाला आहे.

कॉर्पोरेट सिटिझन मासिकाच्या संपादक विनिता देशमुख, ज्यांनी एसबीयुपच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्ससोबत हा कार्यक्रम सह-आयोजित केला होता त्या म्हणाल्या, “पत्रकारिता ही लोकसेवेची शुद्धतम स्वरूपातील सेवा होती. मात्र गेल्या दीड दशकात परिस्थिती नाट्यमयरीत्या बदलली आहे. प्राथमिक हितधारक — वाचक — हळूहळू बाजूला पडला आहे आणि व्यापारी स्वार्थ केंद्रस्थानी आले आहेत. डिजिटल आणि सोशल मीडियाने बातमी प्रसारण लोकशाहीकृत केले असले तरी माहिती, मत आणि उत्तेजनवाद (सेन्सेशनलिझम) यांमधील सीमा पुसल्या गेल्या आहेत.”

या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट सिटिझनने, बालाजी स्कूल ऑफ मीडिया, कम्युनिकेशन अँड जर्नलिझम (बीएसएमसीजे) च्या मार्गदर्शनाखाली, ‘मीडिया बॅरोमीटर२०२५’ हा परिसंवादही आयोजित केला होता. या क्लोज्ड-डोअर कार्यक्रमात वीसपेक्षा अधिक वरिष्ठ पत्रकार, मीडिया शिक्षक, पब्लिक रिलेशन्स व्यावसायिक तसेच प्रिंट, टीव्ही, डिजिटल आणि सोशल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले.

सीबीयुपीच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, तसेच स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. प्रीती जोशी यांनी या अहवालाचे शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. “हा अहवाल आजची माध्यमे कशी काम करत आहेत हे दर्शवतो. तो केवळ आपल्याला माहिती देत नाही, तर आपण कुठे जात आहोत याचे आत्मपरीक्षण करण्यास मदत करतो,” असे त्या म्हणाल्या.

वरिष्ठ पत्रकार आणि संपादक आनंद आगाशे यांनी हा अहवाल सादर केला आणि सीबीयुपी चे मन:पूर्वक आभार मानले. आजच्या माध्यम क्षेत्रातील संकुचित होत चाललेल्या संपादकीय अवकाशाबद्दल त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. “पत्रकारितेची जागा कमी झाली आहे. म्हणूनच आम्ही माध्यमांचे हे अनामिक रेटिंग केले. एकूण ५७ मापदंडांवर कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले, “आजच्या माध्यमांचे आंतरिक आणि बाह्य हितधारकांनी केलेला सखोल ‘आरोग्य अहवाल’ आवश्यक आहे, ज्यातून खऱ्या समस्यांची जाणीव होते. श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (सीबीयुपी) येथे सप्टेंबर/ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित मीडिया बॅरोमीटर परिसंवाद हा त्या दिशेने एक पाऊल आहे. देशाच्या विशालतेचा विचार करता, असे उपक्रम भारतातील विविध भागांमध्ये होणे गरजेचे आहे. यामुळे नागरिक आणि नागरिक-पत्रकारांसाठी मीडिया साक्षरतेच्या दृष्टीने उत्कृष्ट इनपुट्स मिळतील. आपल्याला ‘योग्य माध्यम’ हवे असेल तर हे घडणे अत्यावश्यक आहे.”

सीबीयुपीचे कुलगुरू डॉ. जी. के. शिरुड यांनी बातम्या समजून घेताना ‘सामग्री आणि संदर्भ’ दोन्हींकडे पाहण्याची गरज अधोरेखित केली. माध्यमांवर अनेकदा दबावाखाली काम करण्याची वेळ येते, हे त्यांनी नमूद केले आणि सीबीयुपीने शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील नवोन्मेषी उपक्रमांना सतत प्रोत्साहन देण्याची बांधिलकी व्यक्त केली. “हा मीडिया बॅरोमीटर भारताच्या मीडिया पर्यावरणाचे संतुलित मूल्यमापन सादर करतो. जुनी प्रिंट आणि प्रसारमाध्यमे तसेच वेगाने बदलणाऱ्या डिजिटल क्षेत्राचा तो सर्वांगीण आढावा घेतो. संस्थात्मक सामर्थ्ये, नियामक आणि नैतिक उणीवा, तसेच बातमी निर्मिती आणि वितरणावर व्यापारी व तांत्रिक दबाव कसा परिणाम करतो यावर तो प्रकाश टाकतो,” असे ते म्हणाले.

अहवालाच्या अधिकृत प्रकाशनानंतर “मीडिया एक्स्प्लोजनच्या युगातील पत्रकारिता” या विषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेत वरिष्ठ प्रिंट व टीव्ही पत्रकार, चित्रपट निर्माते आणि लेखक डॉ. समीरण वालवेकर, अन्वेषक पत्रकार आणि लेखक सिद्धार्थ्य रॉय, द हिंदू ग्रुपचे सीनियर डेप्युटी एडिटर राधेश्याम जाधव तसेच मीडिया शिक्षिका त्रिवेणी गोस्वामी माथुर आणि संशोधक यांनी सहभाग घेतला. चर्चेत नम्र/वश झालेले माध्यम, पर्यायी उपाय, घटलेली न्यूज-रूम क्षमता, डिजिटल सामग्रीचा स्फोट आणि बदलणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा यांवर सखोल ऊहापोह करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading