Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे: प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आदरणीय शास्त्रज्ञ आणि साहित्याच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रसार करणारे साहित्यिक जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्यासाठी संशोधनाला चालना देणारे शास्त्रज्ञ म्हणून जगभरात डॉ नारळीकर यांना आदराचे स्थान आहे.

डॉ नारळीकर यांनी ११ जून १९६४ रोजी गुरुत्वाकर्षणासंबंधी महत्त्वाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामुळेच विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडणाऱ्या संशोधनाला चालना मिळाली. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना सन १९६५ मध्ये पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते केवळ २७ वर्षांचे होते. 

डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे बनारस हिंदू विश्वविद्यालयात गणित विभागप्रमुख होते. त्यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झले. त्यांनी विज्ञान विषयात प्रथम क्रमांक पटकावून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज येथे उच्च शिक्षण प्राप्त केले. तब्बल ४० वर्ष डॉ नारळीकर यांनी खगोल भौतिकीच्या क्षेत्रात संशोधन केले. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर लिखाणही केले. विशेष म्हणजे त्यांचे बहुतेक लिखाण मराठीतून आहे. 

डॉ नारळीकर यांच्यामुळे भारतीय विज्ञान कथेला नवा आयाम प्राप्त करून दिला. यक्षांची देणगी या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांनी अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, टाईम मशीनची किमया, प्रेषित अशी अनेक पुस्तके लिहिली. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या. त्या विविध नियतकालिकातून नियमितपणे प्रसिद्ध झाल्या. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नारळीकर यांनी भूषविले. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading