श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करत “ऑपरेशन सिंदूर”चा आनंदोत्सव पुणेकरांकडून साजरा
पुणे : जम्मू काश्मीरचा पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २७ भारतीय नागरिकांचा बळी गेला. ज्यांचे कुंकू पुसले गेले त्या लेकींच्या अश्रूंना उत्तर देण्यासाठी भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या शौर्यगाथेचा विजयोत्सव आज पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर “भारत माता की जय!”, “वंदे मातरम!” च्या घोषणांनी दणाणून गेला होता.
यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्यात भारताच्या २७ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून भारतात परतले आणि थेट जम्मू काश्मीरला गेले. त्यांनी तेव्हाच इशारा दिला होता की या हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. आज भारतीय सैन्याने ते सिद्ध करत पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.”
“आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगात शांततेचा संदेश पसरतो आहे. मात्र भारतावर कोणताही भ्याड हल्ला झाला, तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे. आमच्या नादाला लागणाऱ्याला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा स्पष्ट संदेश पाकिस्तानला आजच्या कारवाईतून मिळाला आहे. पहलगाम हल्ल्यातील मृत २७ नागरिकांना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे,” असेही आमदार रासने यांनी नमूद केले.
महाआरतीसाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यांच्या माध्यमातून या आनंदोत्सवाचे संयोजन करण्यात आले.
