वेदावर हल्ला आणि शिवनाथमुळे अंबिका कैद अंबिका, मीरा आणि अथर्वला कशी एकत्र आणेल?
‘तूला जपणार आहे’ मालिकेत अंबिकाचा वेदाच्या रक्षणासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरूच आहे. अथर्व आणि माया एका पवित्र विधीसाठी बसतात, पण अंबिका अस्वस्थ आहे, तिला हा विधी होऊ द्यायचा नाहीये कारण तिला जाणीव आहे की पुढे काहीतरी अनर्थ ओढवू शकतो. विधी सुरू असतानाच वेदा पाण्यात पडते, आणि गोंधळ उडतो. मीरा वेदाला वाचवण्यासाठी धाव घेते, हे पाहून अंबिकाला जाणवतं की मीरा हीच वेदाच्या रक्षणासाठी योग्य व्यक्ती आहे. मीरा वेदाला वाचवण्यासाठी धावत जात असतानाच त्या गडबडीत अथर्व व मायाच्या विधीमध्ये अडथळा येतो. या सगळ्याला अंबिका दैवी संकेत मानते. अथर्व वेदाला वाचवण्यासाठी पुढे जातो, पण तेव्हाच त्याला कळते की मीराने, वेदाचा जीव वाचवला आहे. अंबिका आता मीरासोबत जास्त वेळ लागतेय आणि तिला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करतेय. दरम्यान, रंगराज बाबा मीराच्या बंडखोरीला वैयक्तिक अपमान मानून सूड उगवायचं ठरवतो. काकूच्या मदतीने तो मीरासाठी सापळा रचलाय. त्याचवेळी, मीरा नकळत अंबिकाला स्मशानभूमीत घेऊन जाते. तिथे शिवनाथ,अंबिकाला कैद करणार आहे. अंबिका कैद झाल्यामुळे माया तिचे मनसुबे सहज अमलात आणते. वेदावर पुन्हा अज्ञात शक्ती हल्ला करतात. तिथेच, रंगराज बाबाच्या लोकांकडून मीराचे अपहरण होते, आणि तिला जबरदस्तीने आश्रमात नेलं जातं. रंगराज बाबाने आपल्या नीच हेतूंसाठी आश्रमात एक शामियाना तयार केलाय. अंबिका कैद असल्यामुळे वाटत असूनही ती मीराची मदत करू शकत नाही. पण तेव्हाच, तिच्या अग्नीच्या वर्तुळात एक चाफ्याचं फूल उमलतं आणि लगेच नाहीसं होतं. रंगराज बाबा मीरावर हल्ला करणार इतक्यात, अंबिका मीराच्या साहाय्याने रंगराज बाबावर हल्ला करते आणि मीराला वाचवते. संतापाच्या भरात मीरा रंगराज बाबावर प्रहार करते, ज्यामुळे तो गंभीर जखमी होतो.
रंगराजबाबावर केलेल्या या प्रहारामुळे मीरावर काय परिणाम होईल? अंबिका, मीरा आणि अथर्वला कशी एकत्र आणेल? बघायला विसरू नका ‘तुला जपणार आहे’ दररोज रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
