केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार नुसत्या वाफा सोडत – उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी
नागपूरची दंगल पूर्वनियोजित असल्याचा दावा केला जात असेल तर त्याची पूर्वकल्पना राज्याच्या गृह विभागाला का मिळू शकली नाही, ही दंगल आधीच का रोखली नाही, असा सवाल करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार नुसत्या वाफा सोडत असल्याची टीका ठाकरे यांनी केली आ महे.
केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत आहे. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षण आहे. औरंगजेब तुमचा कोण लागतो, असा सवाल भाजप आणि केंद्र सरकारला विचारण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे ही कबर उध्वस्त करण्याची परवानगी मागावी आणि एकदा काय तो या प्रश्नाचा निकाल लावावा, असेही ठाकरे म्हणाले.
औरंगजेबाची कबर हे शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक
महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हातात उधळ फावडी घ्यावी आणि ही कबर खणून काढावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
