Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

लढ्याला न्याय मिळत नसल्याची शोकांतिका; भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांची खंत

 

पुणे   : आमच्या न्याय हक्कांसाठी सर्वोच्च न्यायायलायात  अकरा वर्षांपूर्वी त्याबाबतची याचिका आम्ही दाखल केली आहे, मात्र आमच्या लढ्याला अद्याप  न्याय मिळत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आणि सखी चारचौघी संस्थेच्या संचालिका श्रीगौरी सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केली. हिंदू महिला सभेतर्फे “एक टाळी आणि बरंच काही ” या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीगौरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन एस.एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले यांनी श्रीगौरी सावंत यांचा सत्कार केला.

प्रसिद्ध लेखिका आणि जेष्ठ मुलाखतकार माधुरीताई ताम्हणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही भारतीय आहोत, संविधानाने आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे, पण आम्हाला आमचे हक्क मिळवण्यासाठी भांडावे लागत आहे. २०१४ मध्ये आम्ही त्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायायलायात दाखल केली आहे. आज अकरा वर्ष उलटून गेली तरी आमच्या लढ्याला न्याय मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे सावंत एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाल्या.

आपला जन्म पुण्याचा, इथल्या भवानी पेठेतल्या पोलीस लाइनमध्ये लहानाची मोठी झाले, तिथे राहत असताना आलेले अनुभव त्यानंतर घरातून ६० रुपये घेऊन मुंबईला गेल्यावर आलेले अनुभव, याचा पट श्रीगौरी यांनी यावेळी उलगडला. पुणे हे माहेर असून मी जो श्वास घेत आहे तो माझ्या मुलांसाठी असल्याचे सांगताना श्रीगौरी भावुक झाल्या होत्या. मुंबईमध्ये गायत्री नावाच्या मुलीचा सांभाळ करताना आपल्याला तिची आई बनून राहताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी संगितले.

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्याच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर बोलताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या, आम्हाला शाळेतील मुलांना शिकवण्याची संधी द्यायला हवी. आईच्या गर्भानंतर दुसरे संस्कार केंद्र कोणते असते तर ती शाळा असते, असे त्या म्हणाल्या.  त्यामुळे इथे आम्ही चांगलेच काम करू अशा प्रकारचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

ताली या वेब सिराजच्या निमित्ताने सुश्मिता सेन यांच्याबरोबर झालेली भेट. कौन बनेगा करोडपती च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झालेला संवाद… तिथे जिंकलेले २५ लाख रुपये त्यामधून समाजासाठी काम करण्याचा वाढलेला हुरूप त्यांनी यावेळी त्यांनी शब्दबद्ध केला. विदेशात काम करताना आलेले अनुभव सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना जोगळेकर यांनी केले तर सुप्रिया दामले यांनी शेवटी आपले मनोगत व्यक्त केले. मीना कुर्लेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading