Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : ‘सध्या आर्टीफिशियलचा जमाना आहे. त्याचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान घोड्यासारखे असते. त्याला घाबरून चालणार नाही आणि नाकारून सुद्धा चालणार नाही. तंत्रज्ञानावर ठाण मांडून बसायचे आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग प्रसार आणि प्रचारासाठी करून, मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दरम्यान, पुढच्या पाच वर्षांत एक विश्व मराठी संमेलन परदेशात घेऊन मराठीचा डंक्का वाजविण्यात येईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बापू पठारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, रंगनाथ पठारे, डॉ. राजा दीक्षित आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, “आज आपण एआयच्या युगात आहोत. वेबसाइटवर साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध करून देण्याऐवजी स्मॉल लॅग्वेज मॉडेल तयार करावे. त्यात सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले पाहिजे. चॅट जीपीटीला प्रश्न विचारतो, तसा एक प्रश्न या मॉडेला विचारल्यास संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. मराठी भाषा विभागाने हा प्रयोग करावा. एआयचा उपयोग करुन स्मॉल लॅग्वेज मॉडेल तयार करून, त्या माध्यमातून पुढच्या पिढी करता अभिजात साहित्य कसे पुढे घेऊन जाता येईल, याचा विचार करावा लागेल.”

अजित पवार म्हणाले, “मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल स्वाभिमान बाळगणारी माणसे जगाच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनासाठी आली. परदेशातूनही मराठी प्रेमी येथे आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने मराठी भाषेसाठी योगदान देत असतो.” तसेच, दिल्लीतील मराठी शाळेला महाराष्ट्र सरकारकडून मदत केली जाईल, असे पवार यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठी भाषेला अडीच वर्षांपूर्वी अभिजात दर्जा मिळाला, हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा विषय आहे. आपल्या भाषेत उत्तम साहित्य निर्माण होते, हे आपण दाखवून दिले आहे. आम्ही राजकीय कार्यकर्ते, तसेच भाषेचेही कार्यकर्ते आहोत. आम्ही मराठी भाषेसाठी जे जे काही करता येईल, ते आम्ही सरकारच्या माध्यमातून करू.” मनीषा म्हैसकर यांनी प्रास्ताविक केले.

‘विश्व संमेलनाला मी पुन्हा येईन…’

‘जगच्या पाठीवर एकही असा देश नाही जिथे मराठी माणूस पोहचला नाही. आम्ही दावोसला गेलो, तिथे मराठी माणसे स्वागतासाठी आली होती. यावेळी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गाणे ऐकल्यावर आनंद झाला. मराठी माणूस इतक्या वर्षांपासून बाहेर असला तरीही माय मराठीपासून दुरावलेली नाही. त्यांच्या मनात मराठी असून पुढच्या पिढीपर्यंत भाषा पोहचविण्याचे काम करत आहेत. मी कुठेही गेलो तरी पुन्हा येईन, असे म्हटले जाते. अलिकडच्या काळात याला चांगल्या अर्थाने म्हटले जात आहे. शेवटी एखाद्या शब्द चिकटला, तर काळ आणि वेळेप्रमाणे त्याचे अर्थ बदलत जातात. जेव्हा जेव्हा विश्व संमेलन होईल त्यावेळी तुम्ही सर्वांनी पुन्हा येईल असे म्हणायला हवे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी भाषा, माणसाला त्रास दिल्यास कठोर शासन- उदय सामंत

संमेलनाच्या उद्घाटनावेळी उदय सामंत म्हणाले, “सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात अभिजात दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन होत आहे. मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम पुणेकरांनी उचलून धरला आहे. मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार-प्रसार झाला पाहिजे, त्यासाठी मराठी ही शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचली पाहिजे. शोभा यात्रेत सात ते आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले पाहिजे. युवा पिढीची जबाबदारी आहे, की मराठी टिकविणे आणि आक्रमणाचा आक्रमकतेने प्रतिकार केला पाहिजे. मराठी टिकविणाऱ्यांचा आदर्श हा दीपस्तंभाप्रमाणे ठेवला पाहिजे. पुढील वर्षी मालगुंड गावाला पुस्तकाच्या गावाचा दर्जा दिला जाईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्रातील अशी गावे शोधली जातील, त्यामध्ये मराठी जतन-संवर्धन करणाऱ्या व्यक्तीचे गाव पुस्तकांचे गाव केले जाईल. महाराष्ट्रात प्रत्येक जाती-धर्माचा माणूस राहतो. प्रत्येक भाषकाचा आदर केला आहे. भाषेचा अनादर केलेला नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषा, माणसाला त्रास देण्याचे काम करत असतील, तर कठोर कायद्याद्वारे शासन झाले पाहिजे. मराठीचे अस्तित्व, अस्मिता टिकविण्याची कार्यवाही केली पाहिजे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading