लहान मुलांच्या कलागुणांना शालेय जीवनातच प्रोत्साहन देण्याची गरज – शिल्पी सिन्हा
पुणे : सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञानामुळे लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीची सवय लवकर लागते. त्यामुळे त्यांच्यातील कला गुणांकडे मात्र दुर्लक्ष होते .बालपण निघून गेल्यावर पुन्हा कलागुण आत्मसात करणे अवघड जाते, त्यामुळे चित्रकलेसारख्या माध्यमातून लहान मुलांच्या कलागुणांना शालेय जीवनातच प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत पारले कंपनीच्या नॅशनल सेल्स मॅनेजर शिल्पी सिन्हा यांनी व्यक्त केले.
ग्राहक पेठ आणि पारले तर्फे आंतरशालेय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, पारले कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर उमेश कामथ, कार्तिक शहा, ग्राहक पेठेच्या उपाध्यक्ष संध्या भिडे, शिवराम हाके आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे शहर आणि परिसर 42 शाळांमधील सहा हजारांकडून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांना या प्रसंगी विविध विभागांमध्ये पारितोषिके प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी डीईएस न्यू इंग्लिश स्कूल शनिवार पेठ यांना तर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे स्कूलला प्रदान करण्यात आली.
शिल्पी सिन्हा म्हणाल्या, पारले बिस्किटापासून ते चॉकलेट पर्यंत सर्व उत्पादनांच्या माध्यमातून पारले कंपनी लहान मुलांपर्यंत आणि देशातील प्रत्येक घरामध्ये पोहोचली आहे. देशामध्ये असे कोणतेही घर नसेल त्या ठिकाणी पारले उत्पादन नाही. त्यामुळे या माध्यमातून एक प्रकारे पारले कंपनीने चित्रकला आणि त्यातून संस्कार मुलांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना पारले कंपनीचा निश्चितच पाठिंबा राहिला आहे. ग्राहक पेठ केवळ स्पर्धा घेण्याचे काम करत नाही तर एक प्रकारे लहान मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचे काम करत आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, केवळ विविध उत्पादने विकून नफा कमावणे हे ग्राहक पेठेचे उद्दिष्ट नाही, तर ग्राहकांचे प्रबोधन आणि ग्राहकांचे संरक्षण करणे हे ग्राहक पेठेचे मुख्य काम आहे. ग्राहक पेठेचा बिस्किटाचा गणपती संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. यामध्ये पारले कंपनीचे मोठे योगदान असून हा उपक्रम गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे. त्यानंतर पारले कंपनीला शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी आणखी काय करता येईल या संदर्भात विचारणे केली असता त्यांनी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ग्राहक पेठेला पाठिंबा दिला आणि त्याचे स्वरूप आता मोठे झाले आहे. यातून केवळ कलाकार घडणार नाही तर विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविले जातील याची आम्हाला खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले. संजय कंदलगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
