महामार्गावरील 20 किलोमीटर पर्यंतचा प्रवास मोफत
नवी दिल्ली: टोल नाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा, खोळंबलेली वाहतूक आणि फास्टटॅग या सगळ्याला टाटा बाय बाय करून स्वयंचलित पद्धतीने थेट बँक खात्यातून टोल वसुली करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेनुसार महामार्गावरील 20 किलोमीटर पर्यंतचा प्रवास मोफत असणार आहे. महामार्गावर जितके किलोमीटर वाहन प्रवास करेल त्यानुसार या यंत्रणेमार्फत टोल वसुली केली जाणार आहे.
यापुढे प्रत्येक वाहनात ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेद्वारे वाहन कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याने महामार्गावरून नेमका किती अंतराचा प्रवास केला हे जाणून घेता येणार आहे. जेवढे अंतर वाहन महामार्गावरून प्रवास करेल त्यानुसार टोलची आकारणी करून नोंद करण्यात आलेल्या बचत खात्यातून टोल वसूल केला जाणार आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या GAGAN आणि NavIC या नेव्हिगेशन सिस्टीमवर ही यंत्रणा काम करणार आहे.
ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वाहनांमध्ये जीपीएस आणि ऑन बोर्ड युनिट्स असणे आवश्यक आहे. ही योजना देशभर कार्यान्वित झाल्यानंतर महामार्गावरील टोल नाके, रोख रक्कम अथवा फास्ट टॅग द्वारे टोल वसुली, त्यासाठी नाक्यांवर होणारी गर्दी, वाहनांच्या रांगा, वाहतुकीचा खोळंबा या बाबी कालबाह्य होऊन महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.
