ई कारच्या किमती आवाक्यात येतील – नितीन गडकरी
नवी दिल्ली:
विजेवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही चार चाकी वाहनांच्या किमती अद्याप अधिक आहेत. मात्र, आगामी दोन वर्षात उपलब्धता वाढल्याने चार चाकी वाहनांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. त्यामुळे देशातील वाहन व्यवसायात मोठे फेरबदल अनुभवाला येतील, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दि ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या 64 व्या वार्षिक सभेत गडकरी बोलत होते.
विजेवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांच्या सुट्ट्या भागांची आणि खुद्द इंजिनची निर्मिती भारतात होऊ लागली आहे. त्यामुळे देशात विजेवरील दुचाकी निर्मितीला वेग आला आहे. अर्थातच विजय वरील दुचाकींच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र, विजेवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांचे सुट्टे भाग अद्याप आयात करावे लागत आहेत. ही परिस्थिती दोन वर्षात निश्चितपणे बदलेल आणि देशात विजेवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांचे सुट्टे भाग तयार होऊ लागतील. अर्थातच उपलब्धता वाढल्याने विजेवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांच्या किमती पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या बरोबरीने येऊन पोहोचतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आणि अवजड उद्योग मंत्रालयाने विजेवरील चार चाकी वाहनांवर अनुदान देण्यास आपली कोणतीही हरकत नाही. दोन्ही मंत्रालयांच्या समन्वयाने हा निर्णय होऊ शकतो. मात्र, मुळात विजेवर चालणारे वाहन हे इंधनाच्या बाबतीत बचत करणारे आहे. विजेवरील वाहने आणि त्यांचे सुटे भाग याचे उत्पादन भारतात वाढू लागले आहे. त्यामुळे अनुदान न देता ही विजेवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांच्या किमती आटोक्यात ठेवण्यास यश मिळू शकते, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
