संतांच्या मुखातून आलेले हे अभंग हे ईश्वरीय प्रसाद -डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचे मत
पुणे : अभंग हे मंत्र आहेत. संतांच्या मुखातून आलेले अभंग हे ईश्वरीय प्रसाद आहे. त्याचा अपभ्रंश करुन त्या प्रसादाचा आपण अपमान करतो. पसायदान म्हणताना देखील बहुतांश वेळा ते शुद्ध म्हटले जात नाही, त्यावर देखील शाळांशाळांमधून काम करावे लागेल,असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाच्या सातव्या दिवशी ज्ञानोबा-तुकोबांचे पसायदान या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनमालेचा नुकताच समारोप झाला.
डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज म्हणाले, स्वतःच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी संतसंगती महत्त्वाची आहे. भक्तीच्या अंतकरणाने संत ईश्वराला हृदयात घेतात म्हणून देव त्यांचा होतो. आपण फक्त गरजेपुरते देव सांभाळतो. संतांचे मागणे विश्वाच्या कल्याणासाठी असते तर आपले मागणे स्वतःसाठी आहे. म्हणून आपल्या मागण्याला विकृती आहे तर संतांच्या मागण्याला प्रसाद आहे.
