राजकीय आकसापोटी अनेक जण बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना टीकेचे लक्ष्य करीत आहेत – सुनील गावस्कर
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या करीत असलेली कामगिरी लक्षणीय आणि खेळाला प्रोत्साहन देणारी आहे. मात्र, राजकीय आकसापोटी अनेक जण बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना टीकेचे लक्ष्य करीत आहेत, असे मत सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
जय शहा यांनी भारतीय क्रिकेटसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महिला खेळाडू आणि पुरुष खेळाडू यांच्या मानधनात समानता आणणे, महिला क्रिकेट प्रीमियर लीग सुरू करणे, अशा अनेक निर्णयामुळे भारतीय क्रिकेटला प्रोत्साहन मिळाले आहे. जय शहा हे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र असल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्यावर टीका केली जाते, असे गावस्कर यांनी सूचित केले आहे.
जय शहा यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे प्रभारी म्हणून क्रिकेट व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. पुढे ते बीसीसीआयसी संलग्न होऊन काम पाहू लागले. सन 2019 पासून जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत.
टी 20 विश्वचषक जिंकून भारतात परतलेल्या संघाचा सत्कार वानखेडे स्टेडियम वर करण्यात आला. या कार्यक्रमात जय शहा हे खेळाडूंबरोबर पहिल्या रांगेत बसल्याबद्दल माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली. जगभरात कुठेही विजेत्या संघाबरोबर पदाधिकारी किंवा संघ व्यवस्थापनाचे अधिकारी यांना स्थान दिले जात नाही, असे आजार यांनी नमूद केले आहे.
