जिल्ह्यातील पर्यटनाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यायला हवेत – आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने आता ठोस निर्णय घ्यायला हवेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली.
गेल्या महिनाभरात कळसुबाई शिखरावर दोन वेळा वाहतूक कोंडीप्रमाणे पर्यटकांची गर्दी झाली होती. गेल्या रविवारी एका पर्यटकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तोरणा किल्ल्यावरही हार्ट अटॅकने एक पर्यटक गेला आहे. ताम्हिणी अभयारण्यातील दोन धबधब्यांमध्ये आत्तापर्यंत तीन पर्यटक वाहून गेले आहेत. भुशी डॅम धबधब्याच्या इथे रविवारी पाच जण वाहून गेले. हरिश्चंद्र गडावर गेलेली एक तरुणी पाच दिवस झाले बेपत्ता आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
याशिवाय सिंहगड, सांदण व्हॅली, हरिहर गड येथे पर्यटकांची गर्दी होत असते. अपघात , दुर्घटना टाळायच्या असतील तर, या गर्दीवर नियंत्रण यायला हवे, पुणे जिल्ह्यातल्या मुळशी लोणावळा ताम्हिणी भागातले धबधबे अजून सुरू झालेले नाहीत, तरी सुद्धा गर्दी वाढली आहे. याकडे आमदार शिरोळे यांनी लक्ष वेधले.
एकदा थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सर्व विभागांची बैठक घेऊन यावर काही उपाययोजना आणि एसओपी कराव्यात, अशी मागणी शिरोळे यांनी केली. धबधब्यांच्या परिसरात गर्दीचा अंदाज ओळखून तेवढ्याच पर्यटकांना प्रवेश द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळी पर्यटन तुफान वाढते. त्यामुळे सरकारने लवकरच ठोस निर्णय घ्यायला हवेत, अशी आग्रही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
