Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

महायुती सरकारने केला पीएमपीच्या कारभाराचा खेळखंडोबा -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – एका वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या प्रमुख पदांवरील व्यक्ती तीनवेळा बदलून महायुती सरकारने कारभाराचा खेळ खंडोबा केला आहे, असा आरोप माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.

पीएमपी मधून रोज १०लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या यंत्रणेचे संचालन करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी योजना राबविण्यासाठी कंपनीच्या प्रमुख पदी किमान तीन वर्षे आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तिची गरज आहे आणि ही गरज वारंवार लक्षात आलेली आहे. तरीही, राज्यातील महायुती सरकारने वर्षभरात तीन वेळा प्रमुख बदललेले आहेत. त्यामुळे पीएमपीचा कारभारच दिशाहीन झाला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी पुण्यात जास्त संख्येने आहेत. केंद्रात मंत्री आहेत. मात्र, पीएमपीचा कारभार सुधारावा यासाठी लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. फक्त निवडणुका जिंकण्यात दंग झालेला हा पक्ष आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार बसगाड्यांची भर घातली जाईल, असे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. मात्र, त्या दृष्टीने काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. अनेक बस मार्गांवर प्रवाशांना बसची वाट पहात तास न तास ताटकळत उभे रहावे लागते. बस शेड्सही अपुऱ्या आहेत. शहराची वस्ती वाढली त्या कारणाने मार्गांची फेररचना करायला हवी आणि त्यासाठी सक्षम प्रमुख अधिकारी प्रदीर्घ काळ तिथे असायला हवा. मात्र, त्याकडे लक्ष देण्याऐवजी महायुती सरकार बेजबाबदारपणे वागून पीएमपीच्या कारभाराचा खेळ खंडोबा करत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असायला हवी, असे तज्ज्ञ, प्रवासी, स्वयंसेवी संस्था वारंवार सांगत आहेत. मेट्रो रेल्वे हा पर्याय अजूनही वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरलेला नाही, अशा वेळी पीएमपी सुधारण्याकडेच लक्ष द्यायला हवे आणि कंपनीच्या प्रमुख पदांवरील व्यक्तीला किमान तीन वर्षे तरी बदलू नये, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading