विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जण रिंगणात
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत संभाव्य बंडाखोरी आणि क्रॉस व्होटींग टाळून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांनी वेग घेतला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली असून उरलेल्या एका जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
आपल्या संख्याबळानुसार महायुतीतील भारतीय जनता पक्षाने पाच जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दोन जागा शिंदे गटाला तर दोन जागा अजित पवार गटाला देण्यात आले आहेत. शिंदे गटाने आपले उमेदवार ही जाहीर केले आहेत. महायुतीकडे एवढ्या जागा निश्चितपणे निवडून आणण्याचे संख्याबळ आहे.
ही आकडेवारी पाहता महाविकास आघाडी साठी दोन जागा शिल्लक राहतात आपला एक उमेदवार निवडून आणण्याएवढे संख्याबळ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या यापूर्वीही विधानपरिषद सदस्य होत्या. लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात डॉ सातव यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य केले नाही, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊ नये अशी मागणी करणारे पत्रही ठाकरे गटाने दिले आहे. मात्र त्याला न जुमानता काँग्रेसने डॉ सातव यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकणाऱ्या दुसऱ्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट जावा करणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला उमेदवार उभा करणार, याबद्दल उत्सुकता आहे.
