पुढील काळात अधिक जोमाने तिप्पट काम करू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : जनतेने सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्यानंतर आमची जबाबदारी अधिक वाढली असून या पुढील काळात अधिक जोमाने तिप्पट काम करू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिली आहे.
आज पासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. त्याचप्रमाणे विरोधकांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला. याचा अर्थ देशातील जनतेला सरकारची ध्येयधोरणे मान्य आहेत. जनतेने सलग तिसऱ्यांदा निवडून दिल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे, हे नमूद करतानाच सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडाव्या, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प
सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताची आवश्यकता आहे. मात्र, देशाचा कारभार चालविण्यासाठी एकमत आवश्यक आहे. त्यामुळे या पुढील काळात देशसेवा, देशाची प्रगती आणि देशातील नागरिकांच्या आशा आकांक्षा यांची पूर्ती करण्यासाठी एकमत प्रस्थापित करण्याचा संकल्प आपण करीत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.
नवा जोश, नवा उत्साह घेऊन आली 18 वी लोकसभा
भारताच्या संसदीय इतिहासात विद्यमान लोकसभा ही 18 वी लोकसभा आहे. नवीन संसदेच्या वास्तूत होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनापूर्वी देशातील जनतेला संबोधित करताना मोदी यांनी भारतीय संस्कृतीतील अठरा या अंकाचे महत्त्व स्पष्ट केले. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. पुराणांची संख्या 18 आहे. ही लोकसभा देखील 18 वी आहे. या अठराव्या लोकसभेत नवा जोश, नवा उत्साह असेल. ही लोकसभा नव्या गतीने अनेक नवे ठराव घेऊन येईल, असे मोदी म्हणाले.
