Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने देशाला कलाटणी मिळाली – सुनील तटकरे

रायगड : लोकसभा निवडणुकीतील मंतदामाचा तिसरा टप्पा जस जसा जवळ येतोय तशी निवडणूकीत रंगत येत आहे. देशात वेगवेगळ्या आघाड्यांची सरकारे आपल्याला  अनुभवायला मिळाली. आम्ही भाजपसोबत गेलो मात्र आम्ही आमचा सिध्दांत सोडून दिला नाही. 2014 साली  नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आणि देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली, जनतेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन आज दहा वर्षांत झालेला विकास अनुभवत आहोत.  येत्या जूनला ऐतिहासिक निकाल लागेल आणि त्यानंतर संविधानावर आज ओरड करत आहेत त्यांची ओरड नक्कीच थांबलेली दिसेल असा विश्वास रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवारा सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

रायगड लोकसभेच्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील हेदवी येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा खारवी समाज भवनात संपन्न झाली. यावेळी तटकरे बोलत होते.  या जाहीर प्रचार सभेला माजी मंत्री रामदास कदम , माजी आमदार विनय नातू, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, मनसे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शंकर कांगणे, राजेश बेंडल, आदींसह महायुतीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, तुमची – माझी श्रध्दा या संविधानावर आहे आणि कायम राहणार आहे. मात्र नरेंद्र मोदी संविधान बदलणार असे जाणीवपूर्वक सामाजिक पाप विरोधक करत आहेत. देशातील एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण मतदान करणार आहोत. या देशाची अखंडता, एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे. देशात आणीबाणीच्या वेळी उद्रेक झाला आणि त्यातून चळवळ उभी राहून इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

आज देश विकसित होत आहे. अनेक योजना खेड्यापाड्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात लस तयार केली त्या देशाचे नाव भारत आणि त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि यापुढेही राहतील असा ठाम विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

बकासुर, टकमक टोक, बूच अशी वक्तव्ये करत संसदेत काम अनंत गीते यांनी केले. ३० वर्षांत एखाद्या गावातील साधा रस्ताही  गीते यांनी केला नाही. मी ऊर्जा मंत्री असताना राज्यातील भारनियमन रद्द करून जनतेला दिलासा दिला असेही तटकरे यांनी सांगितले.  तसेच, गावावस्तीत जाऊन ही ऐतिहासिक निवडणूक लोकांना सांगण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत जनता साथ देईल आणि राज्यात ४५ +जागा मिळतील असा दावाही तटकरे यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading