Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

हरिमान सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉ. कोल्हेंच संपुर्ण भाषण

राजगुरूनगर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आज शिरुर लोकसभेतील डॉ.अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने आले. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पाया पडून नमस्कार केला. निवडणुका येतात-जातात, पद येतात जातात, पण माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी आवश्यक असल्याच सांगत, महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा, अस आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलं. एरवी वैयक्तिक टीका करणाऱ्या आढळरांवांनी आज मात्र, डॉ. कोल्हे यांचं संपूर्ण भाषण ऐकलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज राजगुरूनगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी अमोल पवार, अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, आबा धनवटे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, निलेश कड, मयूर दौंडकर, राजमाला बुट्टे पाटील, सोमनाथ मुंगसे, सुधीर भोमाळे, संजय घनवट आदी उपस्थित होते.

वाडा गावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉ. कोल्हे आणि आढळराव आमनेसामने आले. डॉ. कोल्हे ज्यावेळी सप्ताहात पोहोचले तेव्हा, आढळराव पाटील भाषण करत होते. त्यांचं भाषण संपताच कोल्हेंनी पाया पडून त्यांना नमस्कार करत संवाद साधला.

त्यानंतर आपल्या भाषणात डॉ. कोल्हे म्हणाले की, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्वाची आहे. निवडणुका येतात जातात, पद येतात जातात, पण त्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे. संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिल.

महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेऊन मतदान करा, अस आवाहन करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, देश पुढची पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. २०१४ ला गॅस सिलेंडरची किंमत ४५० रुपये होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं गॅस सिलेंडरला पाया पडा आणि मग मतदानाला जा. आज गॅस सिलेंडरचे भाव हजाराच्या पुढे गेलेत. त्यामुळे तीन वेळा पाया पडा, मग विचार करुन मतदान करा.
जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो, आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा, अस आवाहन ही डॉ. कोल्हे यांनी केलं.

एरवी प्रचारादरम्यान, वैयक्तिक टीका करणाऱ्या आढळराव पाटलांनी आज मात्र, डॉ. कोल्हेंच संपूर्ण भाषण ऐकलं. भाषण संपल्यावर आढळराव पाटील लगेच आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाले. तर डॉ. कोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाढली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading