सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन कामं केली जातील – आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव : धाराशिवमधून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यानंतर सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन कामं केली जातील. हा मतदारसंघात शिवसेनेचा असला तरी शिवसेन आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्याबाबतीत, त्यांच्या अस्मितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा शब्द भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मतदारांना दिला. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राणा जगजीतसिंह पाटील बोलत होते.
राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले की, ही निवडणूक देश पातळीवरची आहे आणि यातील विषय देखील देश स्तरावरचे आहेत. अस्मिता जी आहे ती राजकीय अस्मिता आहे आणि आता तुम्ही – आम्ही याच राजकीय अस्मितेनुसार काम केलं पाहिजे. अर्चना पाटील या जरी राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्या, त्याचं चिन्ह घड्याळ असलं तरी त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असेही आवाहन त्यांनी केलं. तसचे अर्चना ताईंच्या प्रचारासाठी येत्या 30 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाराशिवमध्ये येणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात मोठी घसरण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या भागातील मतदान बुथवर जास्तीत जास्त मतदान कसे होईल ? याकडे लक्ष देण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
