कला-साहित्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांविषयी जागृती व्हावी : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
पुणे : तेजस्विनी पुरस्कारासाठी आपण सार्थ ठरावे ही स्वत:कडून अपेक्षा-जाणीव ठेवत पुरस्काराला न्याय देणे घडावे ज्यायोगे तेजस्विनी पुरस्कार सार्थ ठरेल. जेथे जेथे तेजस्विनी, रणरागिणी अवतार धारण करावा लागतो तेथे तेथे त्या भूमिकेला न्याय द्यायला ते ते रागरंग धारण करावेत, असा संदेश देणारा हा पुरस्कार आहे, अशा भावना खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे प्रेरणादायी व्यक्तिमत्वास देण्यात येणारा ‘तेजस्विनी’ पुरस्कार खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांना रविवारी प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांच्या हस्ते पुरस्कराचे वितरण झाले. मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन, यांची विशेष उपस्थिती होती.
ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात पुणेकरांनी डॉ. कुलकर्णी यांचा नगरसेविकेपासून खासदारकीपर्यंतचा उल्लेखनीय प्रवास पाहिला आहे. मुलींनी आत्मनिर्भर करण्यासाठी शाळा पातळीवर उपक्रम राबविले जावेत यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती ॲड. आडकर यांनी खासदार कुलकर्णी यांच्याकडे केली.
मला सांस्कृतिक क्षेत्राची आवड आहे, असे नमूद करून खासदार डॉ. कुलकर्णी यांनी कलाकार-साहित्यिकांनी देखील सामाजिक विषयांवर लिखाण करत आपल्या कलेच्या-साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिंना समाजजीवनाशी तुटलेपण असते; परंतु त्यांच्या भोवती असलेल्या एका वेगळ्या प्रभावळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करत सामाजिक विषयांना जोडून घ्यावे.
विपरित परिस्थितीत मुलींना शिकविणाऱ्या माता व वृद्धाश्रमचालिका यांचा सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून करम प्रतिष्ठानतर्फे सन्मान खासदार डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार डॉ. कुलकर्णी यांचा परिचय अपर्णा डोळे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात स्वरचित मराठी गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात वर्षा कुलकर्णी, मिलिंद छत्रे, डॉ. मंदार खरे, सुजाता पवार, स्वाती यादव, वैशाली माळी, प्राजक्ता वेदपाठक, डॉ. दाक्षायणी पंडित, कामिनी केंभावी, अजय जोशी, रुपाली अवचरे, मृदुला खैरनार-कुलकर्णी, कविता क्षीरसागर, स्वप्नील पोरे यांचा सहभाग होता.
