मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक – आढळराव पाटलांचे भावनिक आवाहन
पुणे : राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या शिरुर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. त्यातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी खेड तालुक्यातील मतदारांना भावनिक साद घातल्याचं पहायला मिळालं आहे.
“खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. याचं सगळं श्रेय खेड तालुक्याला जातं. खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तिनदा खासदार झालो. ३० वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.
“मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि नंतर शरद पवार यांचे राष्ट्रवादी असे ५ पक्ष फिरून झाल्यावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे दार ठोठावणारे तुम्ही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीला हजर राहून आम्हाला मिठ्या मारणारे ही तुम्हीच” अशी टीका दिलीप मोहिते पाटील यांनी अमोल कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.
