विचारपूर्वक मतदान करा, अजिबात हलक्या कानाचं राहू नका – अजित पवारांचा सल्ला
पुणे : ग्रामपंचायत निवडणुका, बँकांच्या निवडणुका, मार्केट यार्डच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात. आमदारकीची निवडणूक हे राज्य कोणाच्या हाती द्यायचं हे ठरवण्याची असते तर लोकसभेची निवडणूक ही देश कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, अजिबात हलक्या कानाचं राहू नका; असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, आरपीआय (आठवले गट)चे रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, आगामी काळात जागतिक पातळीवर भारताचे नाव कोण करेल याचा विचार करून मतदान करा
गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत होतो, मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी निवडणूक काळात एकत्र बसून जागावाटप केलं आहे. यामध्ये विजय बापू शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल अशा अनेकांनी आपापल्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन स्वतःची इच्छा महायुतीच्या नियमासाठी बाजूला ठेवली आणि एक चांगलं वातावरण महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तयार झालं आहे. ही निवडणूक गावकी भावकीचे नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे यामध्ये कारण नसताना लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता आम्ही विरोधात लढत आहोत नंतर एकत्रच येणार आहोत, या गैरसमजात राहू नका, असे देखील पवार यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मराठी भाषा जशी बोलू तशी ती वळते. मात्र भाषणांमधला एखादा शब्द उचलून त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. मागील एका सभेमध्ये गुंजवणीचं पाणी इंदापूर, दौंड या दुष्काळी भागांना आणणार असं आम्ही बोललो होतो तर आता प्रचार केला जातोय की भोर वेल्हाच पाणी घेऊन जाणार म्हणून. विकास काम करताना कोणत्याही जनतेच्या हक्काचं पाणी किंवा त्यांच्या तोंडातला घास हिरावून घेतला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल असा शब्द देखील अजित पवार यांनी यावेळी दिला.
आजपर्यंत बारामती मध्ये केंद्र सरकारच्या विरोधी विचारातील खासदार होता त्यामुळे निधी आणता आला नाही मात्र पुढील काळात केंद्रातील विचारांचा खासदार असल्यास आपल्याला निधी मिळवण्यासाठी मदत होईल. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असावा लागतो म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. प्रत्येकाचे दिवस असतात आणि त्या त्या दिवसात त्यांनी त्यांच काम करायच असत. मात्र ते दिवस गेल्यानंतर दुसऱ्यांना पण संधी दिली पाहिजे. हे वर्षानु वर्ष जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून चालत आलेला आहे आणि हे पुणे पण चालत राहील. आपण पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांत नाव न् घेता अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
