समाविष्ट गावांना कर सवलत, विमानतळाचा, पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविणार; आजितदादांची ग्वाही
सासवड : एखादे गांव महापालिकेत किंवा नगरपालिकेत समाविष्ट केल्यास कर एकदम वाढणार नाही यांची काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर जून महिन्यात पावसाळी अधिवेशन या संदर्भात विधेयक आणले जाणार आहे. यातून हवेली, पुरंदर, खडकवसला भागातील नागरिकांना टॅक्स मध्ये दिलासा देण्याचे काम केले जाईल, अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सासवड येथे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे विजय बापू शिवतारे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, एखादे गांव महापालिकेत किंवा नगरपालिकेत समाविष्ट केल्यास कर एकदम वाढतो. मात्र येथील कर एकदम न् वाढवता विकासाच्या तुलनेत टप्प्या टप्प्याने वाढवला जावा असा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे फुरसुंगी, उरूळी देवाची, खडकवासला आदी भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.
पुरंदर भागातील विकास, रिंगरोड, पुरंदर विमानतळ आदींविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकांवर दमदाटी करून आम्हाला कोणताही विकास करायचा नाही. येथील विमानतळ ही काळाची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांची इच्छा आणि जनतेचा पाठिंबा असेल तरच हे विमानतळ उभे राहील. तसेच गुंजवणी धरण प्रकल्प उभारण्याचे काम वेल्हा, भोरकरांना कोणताही त्रास न देता आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन देखील पवार यांनी दिले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, केवळ निधी मिळून उपयोग नाही पण त्याला राजकीय इच्छाशक्तीची देखील जोड पाहिजे, तरच विकास होवू शकेल. मागील 15 वर्षात जेवढा निधी तुमच्या विद्यमान खासदारांनी आणला असेल त्या पेक्षा जास्त निधी राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचा उमेदवार आणेल याची खात्री मी देतो.
